मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा आणि ओबीसींना आरक्षण देण्याची मागणी पुर्ण करण्याचा ठराव संमत करावा अशी सुचना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला केली आहे. जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठाकरे यांनी जालन्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला ही सरकारची क्रुरता असल्याचा आरोप केला.कोणी तरी निर्देश दिल्याशिवाय पोलिस असे कसे वागू शकतात,असा सवाल त्यांनी केला. सायंकाळी उशिरा जालन्यात जाऊन आंदोलकांची भेट घेणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील सरकारी सेवांच्या अधिकारावरील केंद्राचा अधिकार अमान्य करून राज्य सरकारला अधिकार दिला तेव्हा केंद्र सरकारने तातडीने नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (सुधारणा) कायदा 2023 संसदेत संमत केला आहे. त्यावेळी केंद्र सरकारने जशी तत्परता दाखवली तशीच तत्परता त्यांनी मराठा आरक्षणाच्या संबंधातही दाखवली पाहिजे.
ठाकरे म्हणाले की, संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या निर्णयाचा मी निषेध केला होता. पण आता मी त्याचे स्वागत करतो, पण या विशेष अधिवेशनात आधी मराठा, धनगर आणि ओबीसींना आरक्षण देण्याचे प्रस्ताव मंजुर व्हावेत असे ते म्हणाले. जालन्यातील आंदोलकांना भेटण्यासाठी सरकारकडून कोणालाच वेळ मिळाला नाही, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
गणेशोत्सवादरम्यान 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत संसदेची विशेष बैठक बोलावल्यामुळे ठाकरे यांनी केंद्राला “हिंदुद्रोही” म्हटले.कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले, ज्यांचा कुटुंबपद्धतीवर विश्वास नाही त्यांनी इतरांच्या कुटुंबाविषयी बोलू नये. कुटुंब व्यवस्था ही हिंदू परंपरा आहे. आधी तुमचे कुटुंब सांभाळा आणि मग इतरांच्या कुटुंबाबद्दल बोला,असा टोलाही त्यांनी मोदींना त्यांचे नाव न घेता लावला.