कराड : राज्यातील राजकीय घडामोडीवर आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील याचे चिरंजीव रोहित पाटील यांनीदेखील मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांची नाळ ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांशी जोडली गेल्यामुळं जोपर्यंत सर्वसामान्य माणूस पक्षासोबत आहे, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला काही फरक पडणार नाही, असं स्पष्ट मत मांडले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार हे कराड येथील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दाखल होत आहेत. त्यासाठी रोहित पाटील कराडच्या प्रीतिसंगमावर आले असता, ते माध्यमांशी संवाद साधत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तळागाळापर्यंत घराघरापर्यंत पोचलेला पक्ष आहे. निश्चितपणे पक्ष सर्वसामान्यांच्या ताकदीवर पुन्हा उभा राहील. जे आमदार भाजप सोबत गेले आहेत, ते परत येतील की नाही याबाबत आत्ता सांगू शकत नाही. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातील अनेक तरुणांचे आदर्श आहेत.