पालिकेचे दुर्लक्ष; बाजारपेठेत होतेय कोंडी
प्रशांत जाधव
सातारा – कुठलीही इमारत बांधताना त्या इमारतीसाठी पार्किंग असणे अनिवार्य आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र, सातारा शहरातील काही हॉटेल, रेस्टॉरंट, हॉस्पिटलमध्ये तर मोठमोठ्या व्यापारी गाळे असलेल्या इमारतीमध्येही पार्किंगची बोंब असल्याचे वास्तव पुढे आले. भर रस्त्यांवरच गाड्या पार्क केल्या जात असल्याने शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीस मोठा अडसर निर्माण होत आहे.
राजपथावर तर अनेक ठिकाणी व काही हॉटेल, हॉस्पिटलच्या बाहेर “पार्किंग ऍट ओनर्स रिस्क’ अशी पाटी लावलेली दिसते. सर्वोच्च न्यायालयाने यावर नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मालकाच्या जबाबदारीवरच “पार्किंग’ अशी पाटी लावून हॉटेल अंग काढून घेऊ शकत नाही. वाहनाच्या नुकसानीसाठी संबंधित हॉटेल व्यवस्थापनच जबाबदार असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतरही शहरात धक्कादायक चित्र आहे. शहरातील अनेक व्यापारी इमारती, हॉटेल्स, हॉस्पिटलकडे पार्किंग व्यवस्थाच नसल्याने याठिकाणी येणाऱ्यांना रस्त्यावरच आपली वाहने लावावी लागतात. वाहनांमुळे रस्त्याचा मोठा भाग व्यापला जात असल्याने या रोडवरून ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच वाहतूक पोलिसांचा कारवाईचा ससेमिरा मागे लागत असल्याने अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होत असतात.
पार्किंगच्या जागेचा अन्य वापर
काही हॉटेल्स, हॉस्पिटलच्या इमारतींनी तर पार्किंगच्या जागेचा वापर इतर कामांसाठी करायला सुरुवात केली असल्याचेही पुढे आले. नकाशावर पार्किंगची जागा दाखविली असताना प्रत्यक्षात त्या ठिकाणी पार्किंगच उपलब्ध नाही. व्यावसायिक इमारतींना त्या इमारतीत भेट देण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या प्रमाणात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमाकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच रस्त्यांवर उभ्या असलेल्या गाड्यांसाठी पोलिसांची वाहतूक शाखा दंड देऊन कारवाई करते. मात्र, इमारतींमध्येच पार्किंगची सुविधा नसल्याने हा तात्पुरता उपाय समजला जातो. शहरात कायमस्वरूपी पार्किंगची सुविधा उपलब्ध झाली तर ही समस्या सुटू शकेल. हॉटेल्स मालकांनी व काही हॉस्पिटलनाही पार्किंगच्या नियमांची पुन्हा आठवण करून देण्याची गरज असून पालिकेने कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
नियोजनात पालिका नापास
निवासी तसेच व्यावसायिक व्यवस्थापनांनी पार्किंगची सोय केली नसल्यास त्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात असते. मात्र, सातारा शहरात फिरताना अनेक भागात इमारतींसमोर मोठ्या संख्येने वाहनांचे पार्किंग असल्याचे दिसून येते. अशा पार्किंगला कुठे ना कुठे बांधकाम व्यावसायिकच जबाबदार असल्याचे बोलले जाते. तसेच इमारतींना बांधकाम परवाना देताना पार्किंग असल्याची खात्री करूनच तो दिला जातो. असे असतानाही अवस्था नेमकी कशामुळे होत आहे. सातारा पालिका शहरातील पार्किंग व्यवस्था सुधारण्यात अयशस्वी ठरल्याचे वास्तव यावरून पुढे येत आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पादचाऱ्यांचा जीव धोक्यात
शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग असलेल्या राजपथ व खणआळी येथे चहूबाजूंनी पार्किंगची गर्दी असते. या परिसरातील अनेक मार्ग मोठे असूनही अरुंद होत आहेत. कारण, सर्वप्रकारची वाहने थेट रस्त्यांवरच पार्क करण्यात येतात. त्यामुळे येथे अपघात तर होतातच, शिवाय रस्त्यांवरून जाणारी वाहनेही काढता येणे शक्य नाही. आसपासच्या अर्ध्या किलोमीटर भागात पार्किंग झोन नसल्याने वाहने रस्त्यांवरच लावली जातात. परिणामी, चालत जाणाऱ्यांना जीव धोक्यात घालूनच चालावे लागते.