मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)अटक केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची 12 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांना आता 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. तर त्यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अद्याप फरार आहेत. यावरून भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
ईड़ीच्या कार्यालयात हजर झाल्यानंतर देशमुख यांनी परमबीर सिंग कुठय, असा सवाल केला होता. दुसरीकडे या संदर्भात भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंग यांना पळून जाण्यास मदत केली असेल असा दावा केला आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी परमबीर सिंग फरार झाले नसून त्यांना देशाबाहेर जाण्यास सांगितले आहे, जे केंद्राच्या मदतीशिवाय ते करू शकणार नाहीत असे म्हटले आहे.
दरम्यान या मुद्दयाला धरून भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग आदित्य ठाकरेंच्या जवळचे होते ते कुठे पळून गेले त्यांना विचारले पाहिजे असा आरोप नितेश राणेंनी केला आहे. परमबीर सिंग आणि आदित्य ठाकरेंचे संबंध हे जगजाहीर आहेत असेही राणेंनी म्हटले आहे.