चंदिगढ – पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. पंजाब काँग्रेसची कमान नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडे सोपवल्यापासून कॅप्टन पक्षावर प्रचंड नाराज होते. त्यांनी आधी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि आता पक्ष सोडला आहे. यासोबतच त्यांनी नवीन पक्षाची घोषणा केली असून ‘पंजाब लोक काँग्रेस’ असे नवीन पक्षाचे नाव ठेवण्यात आले आहे.
Former Punjab CM Captain Amarinder Singh resigns from Congress party in a letter to Sonia Gandhi pic.twitter.com/CndmJTeEJq
— ANI (@ANI) November 2, 2021
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, ते लवकरच आपला नवीन पक्ष स्थापन करतील आणि तीन कृषी कायद्यांबाबत शेतकर्यांच्या हितासाठी काही तोडगा निघाल्यास 2022 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत जागावाटपाचा करार होईल. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सिंग म्हणाले होते की ते समविचारी पक्षांशी युती करण्याचा विचार करत आहेत. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या सिंग यांनी आपल्या लोकांचे आणि राज्याचे भवितव्य सुरक्षित केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले होते.
नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या राजकीय वादानंतर सिंग यांनी सप्टेंबरमध्ये पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. अमरिंदर सिंग यांनी सप्टेंबरमध्ये दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत चर्चा करताना त्यांना वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेऊन हे संकट दूर करण्याचे आवाहन केले होते. सध्या चरणजितसिंह चन्नी हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत.