– अरुण गोखले
दर गुरुवारी मठात जायचं. श्री दत्तात्रयांचं दर्शन घ्यायचं. थोडा वेळ तिथं बसायचं. थोडसं नामस्मरण करायचं त्या बरोबर तिथल्या सुविचार फलकावरचा रोजचा नवा सुविचार वाचायचा. त्या फलकावर एक विचार वाचला त्यात असे म्हटले होते की ‘घर सांभाळतो तो संसारी आणि मन सांभाळतो तो संत.’ संत आणि संसारी कोण? याची ते अगदी थोडक्या शब्दांत केलेली व्याख्या होती. पण जेव्हा माझा मीच त्या व्याख्येवर विचार करायला लागलो. तेव्हा हळूहळूू लक्षात यायला लागले की ही व्याख्या साधी सोपी आणि लहान नाही तर ती महान आहे.
कारण तसं तर आपल्यात आणि संतांच्यात बघायला गेलं तर विशेष असा काय बदल असतो! उलट आपल्याकडचे काही संत हे तर आपल्या सारखेच संसारी, प्रापंचिक होते आणि आहेतही. मग असं असताना त्यांच्यात आणि संसारी व्यक्तीत नेमका फरक तो काय आणि कोणता असतो? या गोष्टीवर मी विचार करत गेलो तेव्हा असं लक्षात आलं की संसारी काय किंवा संत काय हे वरकरणी जरी एकमेकांसारखेच दिसत असले तरी त्यात मोठा फरक आहे. तो म्हणजे दोघांच्याही मानसिकतेचा.
जो मनुष्य संसारी आहे तो आपलं घरदार, मुलबाळ, बायको, प्रपंच याचा विचार करत असतो. इथला घरदार हा शब्द दोन अर्थांचा आहे. एक म्हणजे माणसाचं राहतं घर आणि दुसरं म्हणजे त्याचा देह. दोन्ही गोष्टी मातीच्याच पण त्यात तो पार अडकलेला असतो. यांचा भार त्याने आपल्या खांद्यावर घेतलेला असतो. तर संतांनी त्या दोन्ही गोष्टींचा भार हा आपल्या खांद्यावर न घेता तो देवाच्या पायावर घातलेला असतो. म्हणून संसारी हा त्या भाराखाली असतो. तर संत हे भारमुक्त असतात. ते सर्व सामान्य जीवासारखी संसार प्रपंच्याची चिंता करत नाहीत, तर ते ईश्वराचे चिंतन करतात.
जो जीव आसक्त असतो तो संसारी आणि जो अनासक्त असतो तो संत. संताकडे देहाच्या पावित्र्यापेक्षा मनाच्या शुद्धतेला अधिक महत्त्व असते. जीवनातली सुखदु:ख ही तर मग तो जीव संसारी असो वा संत प्रत्येकाला ती भोगावी लागतातच. पण संसारी ती परत परत उगाळत बसतो, तर संत त्याचा फिरून विचारही करत नाहीत. त्यामुळेच संत संसारात असूनही सुखी आणि समाधानी असतात.