कर्नाटकातून कामगार आणण्याची वेळ : प्रसिद्ध मळे होणार इतिहासजमा
पळसदेव – इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध पानमळ्यावर संक्रांत आली आहे. तालुक्यातून पानमळे संपुष्टात येत असल्याचे चित्र दिसत आहे. पानमळा मालकांना कामगारांअभावी वैतागून पानमळे तोडून टाकावे लागत आहे. सध्या काही ठराविक शेतकऱ्याकडे पानमळेच शिल्लक राहिले आहेत. पानमळा मालकावर सध्या कर्नाटक राज्यातून कामगार आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अनेकांनी उस्मानाबाद, लातूर भागांतून पानमळ्यात कामगार आणले आहेत. त्याचबरोबर वाढता उत्पादन खर्च व वर्षातील काही ठराविकच दिवस चांगला बाजारभाव असल्याने पानमळा शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. त्यामुळे पान बाजारासाठी प्रसिद्ध असलेली इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीच्या बाजारपेठेतही पानाची आवक रोडावली आहे.
पानमळा लागवड करण्याआधी दोन महिने अगोदर शेतात वाफे काढून त्यात शेवगा पिकाची लागवड केली जाते. त्यानंतर त्यामध्ये दीड ते दोन फुटांच्या अंतराने पानाच्या वेलीची लागवड केली जाते. एकरात सरासरी सात हजार वेलीची लागवड केली जाते. यावेळी सरासरी 10 ते 12 रुपये प्रति वेल याप्रमाणे खर्च होतो. सरासरी 70 ते 72 हजार रुपये वेलीचा खर्च होतो. त्यानंतर प्रथम 3 महिन्यांनी बांधणी करावी लागते. त्यासाठी 9 ते 10 हजार रुपये खर्च येतो. यामध्ये वर्षाला 9 ते 10 बांधणी होतात. यामध्ये 90 हजार ते 1 लाख रुपयांप्रमाणे खर्च येतो.
पानमळ्याला वर्षाकाठी 4 ट्रेलर लेंढी खत टाकावे लागते. त्यासाठी प्रति ट्रेलर 6 हजार रुपयांप्रमाणे खर्च येत आहे.
वर्षाला 34 ते 35 हजार रुपये खतासाठी खर्च करावे लागतात. यापेक्षा खुडणीला सर्वात जास्त खर्च होत आहे. प्रति कवळी 12 रुपयांप्रमाणे एका डागात 30 कवळी असतात. डाग बांधणी 50 रुपयांनुसार 400 रुपये केवळ खुडणी व बांधणीसाठी खर्च येत आहे. त्यात कुशल कामगारांचा तुटवडा असल्याने शेतकरी पुरता वैतागला आहे. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीबरोबर पुणे, श्रीरामपूर, चांदवड, नाशिक, सुरत, जामनगरपर्यंत पळसदेवमधील बाजारात पाने पाठवली जात आहेत. यामध्ये प्रति डाग तीन ते साडेतीन हजार रुपयांचा भाव मिळत आहे.
फाफडा पानाला पाच ते सहा हजार रुपये भाव मिळत आहे. यामध्ये दसरा, दिवाळी, गणेशोत्सवावेळी पानाला उच्चांकी भाव मिळतो. उन्हाळ्यातही चांगल्या प्रकारचा भाव मिळतो. पानमळा लागवडीत सध्या उत्पादक कमी झाल्याने पानाला चांगला भाव मिळत आहे. मात्र, कामगाराअभावी बहुतेक शेतकरी पानमळा पिकाकडे वळण्यास धजवत नाहीत. याशिवाय पानमळ्यासाठी कष्ट अधिक व नैसर्गिक आपत्तीचा धोका देखील वाढला आहे. वादळी वाऱ्यामुळे पानमळा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
इंदापूर तालुक्यातील पानमळे राज्यभरात प्रसिद्ध आहेत. या पानांना देशभरातून मागणी असते. या पिकाचे शाश्वत उत्पादन असले तरी बेभरवशी कामगार आदी कारणांमुळे सध्या पानमळा व्यवसायाला घरघर लागली आहे. त्यामुळे या भागातील अनेक पानमळे शेतकऱ्यांनी तोडून टाकले आहेत.
– राजू काळे, शेतकरी, पळसदेव.