लखनौ – देशाच्या ग्रामीण भागात अगोदरच लसींबाबत संशयाचे किंवा भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे उदासीनता आहे. त्यातच लसींचा तुटवडाही आहे. अशातच उत्तर प्रदेशात सिद्धार्थनगरच्या एका गावात तब्बल 20 जणांना लसींचे दोन वेगवेगळे डोस देण्यात आल्यामुळे ते लोक आता दहशतीखाली असल्याची बातमी आहे.
या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
या गावात 20 जणांना अगोदर कोविशिल्डचा डोस देण्यात आला होता. मात्र, दुसरा डोस घेताना त्यांना कोव्हॅक्सिन देण्यात आली. झाला प्रकार लक्षात आल्यामुळे लस घेणारे लोक भयभीत झाले असून, यामुळे एकूणच गावात घबराटीचे वातावरण पसरल्याचे सांगण्यात येते आहे. दरम्यान, हा बेजबाबदारपणा असून, दोषींची ओळख पटली आहे व त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले.
मात्र, ज्यांना दोन वेगवेगळे डोस दिले गेले त्यांचे काय, असे विचारल्यावर आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेऊन असल्याचे सांगण्यात आले.
या अगोदर उत्तर प्रदेशच्या शामोली येथे असाच बेजबाबदारपणाचा नमुना समोर आला होता. करोनाच्या नावाखाली तेथील काही ग्रामस्थांना चक्क रेबीजचे इंजेक्शन देण्यात आले. एका महिलेने इंजेक्शन घेतल्यावर आपले आधार कार्ड दाखवले. मात्र, रेबीजला आधार कार्डची गरज नसल्याचे तिला सांगण्यात आले.
त्यावेळी आपल्याला करोनाची लस देण्याऐवजी श्वानदंशावरील इंजेक्शन दिले गेले असल्याचे अनारकली नामक त्या महिलेच्या लक्षात आले.