मुंबई | नवीन कृषी कायदा करायचा असेल तर चर्चेच्या माध्यमातून करता येतो. केंद्र सरकारने मंजूर केलेले जाचक कृषी कायदे मागे घेऊन तात्काळ शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे. विषय प्रलंबित ठेवून, शेतकरी थकून हे आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे.
केंद्राच्या जाचक कृषी कायद्यांविरोधात शेतकर्यांनी आंदोलन सुरू केले त्याला आज सहा महिने पूर्ण आहेत. आज शेतकरी काळा दिवस साजरा करत आहेत. या आंदोलनाला राष्ट्रवादीसह १४ पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
लोकांनीही शेतकर्यांना पाठींबा दर्शवत काळी फित लावून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला निषेध नोंदवावा, असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.
केंद्राच्या कृषी कायद्यांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यांची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. कोरोना काळात शेतकरी आंदोलन मंदावले असले तरी सहा महिने शेतकरी याचा विरोध करत असल्याने आंदोलनाची दखल घेणे ही केंद्राची जबाबदारी आहे, केंद्र सरकारने हे कायदे मागे घेतले पाहिजेत, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.