श्री क्षेत्र आळंदी – ज्याप्रमाणे नद्या, नाले, ओढे सागराला जाऊन मिळतात व सागररूप होतात, तद्वत महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यातून निघालेला विठ्ठल भक्तीचा प्रवाह हा भक्तीचा सागर असलेल्या भूवैकुंठ श्री क्षेत्र पंढरीत चंद्रभागेत विलीन होतो. जो विठ्ठल भक्तीत विलीन झाला त्याला पुन्हा जन्ममरणाची भीती नाही. “पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे’ हे संत वचन आहे आणि हेच आठव्या अध्यायाचे सार आहे, असे हभप विशाल महाराज खोले यांनी सांगितले.
म्हणोनि तूप होऊनी माघौतें ।
जेवीं दूधपणा न येचि निरुतें ।
तेवि पावोनियां जयातें ।
पुनरावृत्ती नाहीं ।।
हभप खोले महाराज या अध्यायाचे निरुपण करताना म्हणाले, माउलींनी या अध्यायात ब्रह्माक्षरनिर्देशयोग विस्तृतपणे सांगितला आहे. माऊली सांगतात ज्याचे आकारावाचून अस्तित्व आहे. ज्याला जन्मही नाही आणि अंतही नाही. जे सर्वस्वरुप आहे. जे आकाशापेक्षा पुरातन व परमाणूपेक्षा लहान आहे असा परमात्मा म्हणजे श्री विठ्ठल आहे. जो सूक्ष्म व्यापक आणि जगात असून नष्ट होत नाही, त्याला ब्रह्म म्हणतात.
जो देहाच्या उत्पत्ती नाशामुळे उत्पन्न किंवा नष्ट होत नाही, असा देहस्थ-कूटस्त आत्मा अध्यात्म आहे. असंग अव्यक्त ब्रह्माचे ठिकाणी जगदाकार उत्पन्न होणारा जो व्यापार त्यालाच कर्म म्हणतात. उत्पत्ती विनाश वाण भौतिक शरीर अधिभूत आहे. जो देहात कर्ता, भोक्ता, दृष्टा या स्वरूपात आहे, जो वस्तुतः परमात्मच पण अहंकाराने कार्य कारण उपाधिमुळे तोच जीव अधिदैव आहे.
देहभावाचा नाश करणारा जो साधन प्रयोग आहे त्याला अधियज्ञ म्हणतात. मरणकाळी कोणता मार्ग प्राप्त होईल हे माणसाच्या स्वाधीन नसल्याने हे सर्व अनिश्चित आहे. परंतु, जो माझे नामस्मरण करतो, माझी सेवा करतो. जे अखंडपणे अंत:करणपूर्वक माझ्याशी एकरूप झाले आहेत. त्या भक्तांच्या मरणकाळी मी त्याचा सेवक होतो. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो अशी ज्याची स्थिती झाली आहे. तोच केवळ ब्रह्मरुप स्थानाला प्राप्त होतो. या कार्यक्रमाचे निवेदन हभप स्वामीराज भिसे यांनी केले.