कामशेत, (वार्ताहर) – फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा तडाखा वाढत असून कामशेत येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून. गेले ४ दिवस झाले असून कामशेत येथील पंचशील कॉलनीत पाणी आले नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
परिसरातील सहारा कॉलनी, गरुड कॉलनी, देवराम कॉलनी, आदर्श कॉलनी आदी भागात नियमित पाणीपुरवठा होत नाही. गढूळ पाणी येत असल्याची तक्रार अनेक दिवसांपासून नागरिक करत आहेत. शहरात अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी झाले आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांना काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांना अनेक वेळा शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. परंतु, प्रशासनाकडून जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांनी लवकर वॉटर फिल्टचे काम पूर्ण करण्याची नागरिक मागणी करत आहे
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राम पंचायतिची जलवाहिनी फुटल्याने पंचशील कॉलनीत गेले ४ दिवस पाणीपुरवठा झाला नाही. तसेच ग्रामपंचायती कडून कोणतीच सोय केली नाही. त्यामुळे आम्हाला पाण्याचे टँकर आणावे लागत आहे. ग्रामपंचायतीने लवकर पाणी देण्याची व्यवस्था करावी. अन्यथा महिलांच्या वतीने ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महिलांनी दिला आहे.