पवनानगर, (वार्ताहर) – पुणे जिल्ह्याला गड-किल्ल्यांचा विशेष वारसा लाभलेला आहे. अशा या गड- किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठान मावळच्या वतीने मागील तीन वर्षांपासून दुर्गसंवर्धन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्प अंतर्गत कठीण ठिकाणी पायऱ्यांच्या बांधणीचे काम करण्यात येत असून आत्तापर्यंत ९० पायऱ्या कातळकद्यावर बांधण्यात आल्या आहेत. तसेच किल्ल्यावर असणारा प्रथम प्रवेशद्वारावर लाकडी सागवानी दरवाजा बसवण्यात आला असून मार्च महिन्यामध्ये दरवाजा आणि पायऱ्यांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
वीरगळ संवर्धन
तुंग किल्ल्याच्या परिसरात युद्धाच्या आठवणी करून देणाऱ्या अनेक वीरांच्या स्मृतीशीळा व विरगळी आढळून येतात. त्यांचे जतन व संवर्धन करून प्रत्येक विरगळीची परिपूर्ण माहिती असलेला फलक या ठिकाणी लावला असून वीरगळींचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी छत बसवले आहे. भविष्यात प्रत्येक किल्ल्यावर अशा प्रकारची वीरगळ स्मारक बनवली जावी हा या मागचा उद्देश आहे.
वन्यजीव माहिती फलक
तुंग किल्ल्याच्या परिसरात वन्यजीव आढळतात. सर्पदंश झाला तर प्रथमोपचार काय करावेत याची माहिती फरकावर नमूद. विषारी, बिनविषारी व निमविषारी साप कोणते, याची माहिती लोकांना असणे गरजेचे त्या अनुषंगाने वन्यजीव, सापांची माहिती देणारे फलक लावले आहेत. स्थानिक दुकानात प्रथमोपचार पेटी मोफत उपलब्ध आहे. आपत्कालीन स्थितीसाठी पोलिस प्रशासन, बचाव कार्य, तसेच वन विभाग असे महत्वाचे संपर्क क्रमांक उपलब्ध.
स्थानदर्शक फलक
दुर्गप्रेमीना तुंग किल्ल्याचा इतिहास, जैवविविधतेबाबत माहिती मिळण्यासाठी फलक लावले आहेत, त्यांच्यावर युट्यूबचा क्यूआर कोड दिले आहेत. त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंशी संबंधित माहिती त्यांना सहज मिळते. ही इतिहास माहिती संदर्भासहित मावळातील किल्ल्यावर डॉ. प्रमोद बोऱ्हाडे यांनी दिली. हे सर्व व्हिडिओ मराठीत असून लवकरच ते हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करण्यासाठी काम सुरू आहे, असे सचिन शेडगे यांनी सांगितले.
संशोधनासाठी उपयुक्त
तुंग किल्ल्यावर स्थानिक तसेच इतर राज्यांतून पर्यटक येतात. त्यामुळे किल्ल्याचा इतिहास व त्याचे लष्करीदृष्ट्या असलेले महत्त्व आदींबाबत माहिती मिळावी म्हणून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये फलक लावले आहेत. विद्यार्थी संशोधकांना त्याचा फायदा होत असल्याचे प्रतिष्ठानचे मावळ तालुकाध्यक्ष राजेंद्र सातपुते यांनी सांगितले.
भगवा ध्वजस्तंभ, पिण्याचे पाणी
किल्यावर कायमस्वरूपी टिकेल अशा २५ फुटी भगवा ध्वजस्तंभाचे काम पूर्ण केले असून यावर कायम स्वरूपी भगवा ध्वज फडकत असतो. किल्यावर पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी किल्यावरील पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या आहेत. त्यामुळे आता किल्यावर स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध झाले आहे.
तुंग किल्ल्यावर जुन्या पद्धतीने दगडी पायऱ्यांचे बांधकाम सुरू असून भविष्यात पुरातत्व विभागाकडून उपलब्ध झालेल्या निधीतून मार्गावरील इतर आवश्यक पायऱ्या तसेच अवघड ठिकाणावर रेलिंग, गणेश मंदिराजवळील बांधकाम, व हनुमान द्वाराजळील तटबंदीचे काम पुरातत्व विभागाकडून पूर्ण केले जाणार आहे