पुणे – “ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष करत पालखी सोहळा लाडक्या विठुरायाच्या भेठीला निघाला. मात्र, यंदाच्या सोहळ्यात “सूर्यनारायण’ पालखी मार्गावर प्रखरतेमुळे असल्याने वारकऱ्यांनी उन्हाच्या चटक्यापासून स्वत: सह लहान मुले आणि वृध्द व्यक्तींनी काळजी घ्यावी. आजारी व वृद्ध व्यक्तींनी सोहळ्यात चालू नये, वाहनामध्ये बसून वारी करावी, असे आवाहन पालखी सोहळा प्रमुखांकडून करण्यात आले.
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचे प्रस्थान झाले असून, सोमवारी (दि. 12) दोन्ही पालख्या पुणे मुक्कामी पोहचतील. शहरासह जिल्ह्यात दिवसभर कडक उन्हामुळे अंगाची काहीली होत आहे. अशा परिस्थितीत पालखी सोहळ्यातील वारकरी दररोज 20 ते 30 किलोमीटर पायी प्रवास करतात. त्यामुळे या उन्हाचा त्रास वारकऱ्यांना होऊ शकतो.
वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याकडून आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे. तरीही आजारी व्यक्ती, जास्त वृद्ध व्यक्ती यांनी सोहळ्यात सहभागी होऊ नये. तसेच सोहळ्यात चालणाऱ्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी. ऍड. विकास ढगे पाटील, पालखी सोहळा प्रमुख – श्री संत ज्ञानेश्वर महाराज, आळंदी
अशी घ्यावी काळजी
डोक्यावर टोपी, शक्य असल्यास नाका-तोंडाला पंचा बांधावा
चालण्यास सुरुवात करण्याअधी पुरेसे पाणी प्यावे
उन्हामध्ये चालता चालता जास्त पाणी पिऊ नये
बाहेरील अन्नपदार्थ, थंड पेय टाळावे
विसाव्याच्या ठिकाणी पोहचताच लगेच पाणी पिणे टाळावे
थोडी विश्रांती घेतल्यावर पुरेसे पाणी प्यावे
थकवा जाणवत असेल तर ओआरएस प्यावे
चक्कर येणे, अंग दुखत असेल तर उपचार घ्यावेत
पालखी मार्गावर विविध संस्था, संघटनांकडून अन्नदान, पाणी, थंड पेय वाटप केले जाते. यावेळी उन्हाळा कडक असल्यामुळे शिजविलेले अन्न खराब होवू शकते. अन्न वाटप करताना खबरदारी घ्यावी.
थंड पाणी, लिंबू सरबत, कोकम, रसना वाटप करताना पाणी आणि बर्फ स्वच्छ वापरावा.