कराची – पाकिस्तानने सोमवारी 55 मच्छिमार आणि 5 सामान्य नागरिक मिळून 60 भारतीय कैद्यांची मुक्तता केली. सदिच्छेपोटी ती कृती केल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानने अटक केल्यानंतर संबंधित भारतीय कैद्यांना कराचीमधील मालीर तुरूंगात ठेवण्यात आले होते. पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने फेब्रुवारीत जम्मू-काश्मीरच्या पुलवामात भयंकर आत्मघाती हल्ला घडवला. त्या दुष्कृत्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला. त्यापार्श्वभूमीवर, सदिच्छेचे पाऊल म्हणून चालू महिन्यात बहुतांश मच्छिमारांसह 360 भारतीय कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय पाकिस्तानने जाहीर केला. त्यानुसार, 7 एप्रिल आणि 14 एप्रिलला प्रत्येकी 100 भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली. आणखी 100 भारतीय कैद्यांची पाकिस्तानकडून लवकरच सुटका केली जाण्याची शक्यता आहे.