नवी दिल्ली/लाहोर, – पाकिस्तानी हद्दीत पडलेले क्षेपणास्त्र तांत्रिक चुकीमुळे डागले गेल्याच्या भारताच्या कबुलीच्या दुसऱ्या दिवशी या घटनेच्या काळातील वस्तुस्थिती समोर येण्यासाठी संयुक्त चौकशी करण्याची मागणी पाकिस्तानने केली आहे.
भारतीय संरक्षण दलाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही, ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब असून या प्रकरणाची कोर्ट ऑफ एन्क्वायरी करण्याचे आदेश दिले आहेत.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत शनिवारी पुन्हा निवेदन प्रसिध्दीस दिले. भारतीय माहिती प्रसारण विभागाच्या संरक्षण शाखेचे निवेदन आम्हाला प्राप्त झाले. भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र पाकिस्तानी हद्दीत 9 मार्च 2022ला तांत्रिक चुकीमुळे पडल्याचे सांगून त्याची अंतर्गत कोर्ट ऑफ एन्क्वायरी करण्यात येणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
आण्विक वातावरणात अपघाती अथवा अनधीकृतपणे क्षेपणास्त्र डागले गेल्याने संरक्षण आचारसंहिता आणि तांत्रिक सुरक्षेचे काही मुलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतीय प्रसासनाने दिलेल्या साध्या स्पष्टीकरणाने या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक करता येणार नाही, असेही या निवेदनात नमूद केले आहे.
याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करून भारत सरकारने क्षेपणास्त्रांचा अपघाती वापर आणि त्याचसाठी निर्माण झालेली नेमकी स्थिती टाळण्यासाठी काय उपाय योजना केल्या आहेत, याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.
हेक्षेपणास्त्र स्वयंदिशादर्शक असलेले होते का? मग त्याची दिशा का चुकली? नियमित देखभालीच्या वेळीही भारतीय क्षेपणास्त्रे डागण्यासाठी तयार ठेवण्यात येतात का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर अपघाताने ही घटना घडल्याचे भारतीय प्रशासनाने तातडीने का सांगितले नाही? पाकिस्तानने या घटनेची माहिती दिल्यानंतर भारताने त्याचे उत्तर देण्यासाठी वाट का पाहिली? असाही सवाल उपस्थित केला आहे.
भारतीय दलांकडून सामरिक शस्त्रे वापरताना गंभीर स्वरूपाची त्रूटी या घटनेतून समोर येत आहे. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानी हद्दीत पडल्याने भारताने त्याची अंतर्गत कोर्ट ऑफ एन्क्वायरी करणे पुरेसे नाही. त्यासाठी संयुक्तपणे त्याची चौकशी होण्याची गरज आहे, असे या निवेदनात नमूद केले आहे.