इस्लामाबाद – जगभरातील दहशतवाद्यांसाठी नंदनवन ठरलेल्या पाकिस्तानला आता त्याचे मूल्य चुकवावे लागते आहे. त्या देशात महागाईने कळस गाठल्याच्या बातम्या पूर्वीपासूनच येत असताना आता देशातील अन्नाच्या टंचाईची कबुली खुद्द त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांनीच दिली आहे.
इम्रान खान यांनी गेल्याच आठवड्यात अन्नसुरक्षा हे पाकिस्तान पुढचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे म्हटले आहे. भविष्यात लोकांना अन्नटंचाईपासून वाचविण्यासाठी देशाने पावले उचलण्याची गरज नमूद करतानाच 40 टक्के मुले कुपोषणाला बळी पडल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
इस्लामाबाद येथील शेतकरी परिषदेला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, गेल्या वर्षी पाकिस्तानने 40 दशलक्ष टन गहू आयात केला. याचा परकीय चलन साठ्यावर वाईट परिणाम झाला होता, ज्याची आधीपासूनच कमतरता होती. इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तानसमोर एक नवीन आव्हान आहे आणि सर्वात मोठे आव्हान अन्न सुरक्षा आहे. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी तयारी करण्याची गरज आहे.
पौष्टिक अन्नाअभावी 40 टक्के मुलांचा शारीरिक तसेच बुद्धिचाही विकास होत नसल्याचे नमूद करताना आता अन्न सुरक्षितता हीच राष्ट्रीय सुरक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काही काळापूर्वी पाकिस्तानात नवाज शरीफ यांचे सरकार होते. त्यांनी दहशतवादाला आणि लष्कराला बाजूला ठेवण्याचा आणि आपल्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र नंतर परवेज मुशर्रफ यांनी शरीफ यांची सत्ता उलथवून टाकत लष्कराचा वरचष्मा निर्माण केला. आता तर इम्रान खान लष्कराचे हस्तक असल्याचेच बोलले जाते. मात्र त्यांनीही आता अन्नसुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा यांची सांगड घातल्यामुळे पाकिस्तानातील संकटाची तिव्रता निदर्शनास येण्यास सुरुवात झाली आहे.
शेजारच्या अफगाणिस्तानातही तालिबानी आपली पकड घट्ट करत चालले असून तिही पाकची एक मोठीच डोकेदुखी ठरणार आहे. या सगळ्या घटनांचा दक्षिण आशिया क्षेत्रात प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.