शिक्रापूर/तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतर करण्याबाबतच्या काही घडामोडी डिसेंबर 2021 मध्ये घडल्या होत्या. त्यावेळी ग्रामस्थांनी उपोषण देखील केल्याने कार्यालय स्थलांतराला स्थगिती देण्यात आली होती. दरम्यान रविवारी (दि. 14) रात्रीच्या सुमारास तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत उस्फुर्तपणे चौक बंद करत निषेध करत दुय्यम निबंधक यांना निवेदन दिले.
येथील दुय्यम निबंधक कार्यालय ग्रामस्थांना विचारात न घेता स्थलांतर करण्याबाबतच्या घडामोडी डिसेंबर 2021 मध्ये घडल्या होत्या यावेळी शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आरती भुजबळ व शिवसेना महिला तालुकाध्यक्षा चेतना ढमढेरे आदींनी त्या ठिकाणी उपोषण सुरू केले होते. त्यावेळी उपजिल्हाधिकारी व मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी त्याठिकाणी भेट देत उपोषण सोडवत स्थलांतरला तात्पुरती स्थगिती दिली होती, मात्र दि. 13 फेब्रुवारी 2022 रोजी अचानक सदर कार्यालय नवीन जागेत स्थलांतर करत त्या ठिकाणी कार्यालय नवीन जागेत गेल्याचे फलक लावण्यात आले. हे समजताच ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्य चौक उस्फुर्तपणे बंद करत निषेध नोंदविला.
मुख्य चौक बंद झाल्याबाबत माहिती मिळताच आयपीएस अधिकारी तेगबीरसिंग संधू, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांसह आदींन पोलीस बंदोबस्त लावला. यावेळी शिवसेना महिला तालुकाध्यक्षा चेतना ढमढेरे, पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य ऍड. सुरेश भुजबळ, मनसेचे कैलास नरके, सुनील ढमढेरे, माजी सरपंच महेंद्र पवार, महेश भुजबळ, राकेश भुजबळ, ऍड. दीपक ढमढेरे, ऍड. नितीन ढमढेरे, ऍड. दीपक भुजबळ, ऍड. महेश ढमढेरे, संतोष ढमढेरे, दत्तात्रय ढमढेरे आदींनी निषेध व्यक्त केला.
तळेगाव ढमढेरे दुयम निबंधक कार्यालय स्थलांतर करण्याबाबतचे आदेश आम्हाला वरिष्ठ कार्यालयकडून सप्टेंबर 2021 मध्ये आलेले होते. मात्र त्यावेळी उपोषण, आंदोलन झाले म्हणून थोडे थांबले होते. वरीष्ठांनी मला तोंडी आदेश देत आपले कार्यालय स्थलांतर करण्यास काही हरकत नाही, असे सांगितले. तसेच ऑर्डर भाडे करारासोबत लावली असून त्यानुसार आम्ही कार्यालय स्थलांतर केले आहे.
– अनिता कणसे, दुय्यम निबंधक
तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतर होऊ नये म्हणून मी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या कार्यालय स्थलांतर झाले आहे, यावर अनेक घडामोडी सुद्धा घडल्याने माझ्यावर काही लोक खोटे गुन्हे दाखल करून जीविताला धोका निर्माण करु शकतात असे झाल्यास त्याची जबाबदारी सदर लोकांची राहील.
– ऍड. सुरेश भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य