कानपूर – समाजवादी पक्ष हासुद्धा परिवारवादी पक्ष असून हा पक्ष येथे पुन्हा सत्तेवर आल्यास उत्तर प्रदेशात माफिया शिरजोर होतील, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. कानपूर देहात येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी समाजवादी पक्षाच्या काळात राज्यात अराजक सदृश स्थिती निर्माण झाली होती, असा आरोपही त्यांनी केला.
त्यांच्याकडे मार्ग असता तर त्यांनी कानपूर आणि उत्तर प्रदेशातील इतर भागांना ‘माफियागंज’ मोहल बनवले असते.पण आता त्यांची ‘माफियागिरी’ शेवटचा श्वास मोजत आहे, असा दावाही त्यांनी केला. उत्तर प्रदेशातील जनतेने सावध राहावे आणि उत्तर प्रदेशला पुन्हा माफियांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले.
उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान मोदी म्हणाले, 10 मार्चच्या निकालाच्या दिवशी संपूर्ण उत्तर प्रदेशत होळीच्या रंगाची मुक्त उधळण करेल. तत्पूर्वी, याच सभेत बोलताना यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय बांधले जात आहे असे नमूद करीत आपल्या सरकारने केलेल्या विकासकामांची यादी सादर केली.
सहारनपूर, बिजनौर, अमरोहा, संभल, मुरादाबाद, रामपूर, बरेली, बुदौन आणि शाहजहांपूर या नऊ जिल्ह्या.तील 55 विधानसभा मतदारसंघांत सध्या यूपी निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. तथापि, अन्य टप्प्यांतील प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी येथे कंबर कसली आहे. भाजपने आपले राष्ट्रीय स्तरावरील नेते या प्रचारात उतरवले आहेत.