नवी दिल्ली: जगात आणि देशात करोना विषाणूबाबत एका अहवालात स्पष्ट केले आहे की, मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली जंगलतोड आणि वन्यप्राणांच्या व्यापारामुळे मानवाचे वन्यप्राण्यांसोबत जवळीक निर्माण होते. जंगले नष्ट करून मानवानेच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. वन्यप्राण्यांशी जवळीक साधल्यामुळे त्यांच्यातील आजर मानवात येत आहेत. परिणामी मानवामध्ये साथीचे आजार वाढत आहे.
वर्ल्ड वाइड फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ) फॉर नेचरने आपल्या अहवालात वन्यप्राण्यांमुळे मानवामध्ये प्रसार होणाऱ्या साथआजरांच्या प्रमुख कारणांकडे लक्ष वेधले आहे. यावर तत्काळ वैश्विक उपाययोजना करण्याचीही या अहवालात मागणी करण्यात आली आहे.
“कोविड-19 ः लोक आणि निसर्गाला वाचविण्यासाठी तत्काळ आवाहन’ अशा शिर्षकाखाली सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, मागील काही दशकांमध्ये मानवाने निसर्गात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला असून वन्यजीवजंतूशी जवळीक साधली आहे.
याच्या परिणामी मानव आणि वन्यप्राणी यांच्यांत संपर्क वाढला आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, वन्यप्राण्यांकडून मानवात संसर्ग होणाऱ्या साथीच्या आजारांमध्ये मागील दशकात वेगाने वाढ झाली आहे.
या अहवालात असेही म्हटले आहे की, प्रत्येक वर्षी जवळपास तीन-चार नवीन साथीचे आजार समोर येत आहेत. या नवीन साथआजारांमुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. एचआयव्ही/एड्स, सार्स तसेच सध्याचा कोविड-19सह अनेक धोकादायक आजार निर्माण झाले आहेत.
अहवालात म्हटले आहे की, जंगलतोड आणि अति धोकादायक वन्यप्राण्यांचा व्यापार, शेतीविस्तार हे नैसर्गिक आजार निर्माण होण्यास जबाबदार आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफचे महासंचालक मार्को लंबर्टिनी यांनी म्हटले की, आपल्याला तत्काळ निसर्गाचा नाश आणि मानवी आरोग्य यांच्यादरम्यान असलेले संबंध ओळखण्याची गरज आहे. नाहीतर लवकरच एखादी नवीन महामारी येईल.