इस्लामाबाद -भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जर आशिया चषक तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याची मागणी करत राहिल्यास आम्हीदेखील एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही. जर भारताला आशिया चषकासाठी पाकिस्तानात यायचे नसेल, तर आम्हीही भारतातील आमच्या विश्वचषक सामन्यांसाठीही तशी मागणी करू, असे प्रतिपादन पाकिस्तानचे क्रीडामंत्री अहसान मजारी यांनी केले आहे. एका इंग्रजी न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत मजारी म्हणाले की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड माझ्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने, हे माझे वैयक्तिक मत आहे.
50 षटकांच्या एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक मालिका यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. स्पर्धेचा कार्यक्रमही जाहीर झाला असून, सहयोगी सदस्यांमधून आता नेदरलॅंड आणि श्रीलंका संघांची अंतिम दहा संघांत वर्णीही लागली आहे. मात्र, अजूनही पाकिस्तानच्या सहभागाविषयी संशयाचे धुके दूर झालेले नाही. अशातच पाकिस्तानच्या विविध नेत्यांची वक्तव्ये या वादात खतपाणी घालताना दिसत आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी शनिवारी टीम भारतात पाठवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व प्रकारची तपासणी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली असताना आता प्रत्यक्ष क्रीडा मंत्री मजारी यांचे विधान आल्याने गोंधळात भरच पडत आहे. आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेच्या ठिकाणाबाबत गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानची नौटंकी सुरू आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) आशियाई क्रिकेट परिषद आणि नंतर आयसीसी या दोन्हींविरुद्ध सामना करावा लागला. पाकिस्तानच्या विरोधाला न जुमानता आशिया चषक तटस्थ ठिकाणी होणार आहे. फक्त पाकिस्तानचा संघ चार सामने आपल्याच देशात खेळणार आहे. उर्वरित सामने श्रीलंकेत खेळवले जातील.
त्याचवेळी आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला न जाण्याच्या भारताच्या निर्णयानंतर, आता पीसीबी आणि त्यांच्या सरकारकडून सतत कुरकुर सुरू आहे. विश्वचषकात भारताचा दौरा न करण्याची धमकी पाकिस्तान देत आहे. आधी रमीझ राजा, नंतर नजम सेठी आणि आता पाकिस्तानच्या क्रीडामंत्र्यांनी भारतात न येण्याची धमकी दिली आहे.
मजारी म्हणाले, भारताने खेळांना राजकारणात आणले. मला समजत नाही की, भारत सरकार आपला क्रिकेट संघ इथे का पाठवू इच्छित नाही? काही काळापूर्वी एक भारतीय बेसबॉल संघ इस्लामाबादमध्ये खेळण्यासाठी आला होता. तेथे एक ब्रिज टीम आणि त्यांनी पाकिस्तानला प्रवास केला. पाकिस्तानचे फुटबॉल, हॉकी आणि बुद्धिबळ संघही भारतात खेळतात.
दरम्यान, बीसीसीआयने पाकिस्तानमधील आपल्या संघाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. यावर बोलताना मजारी यांनी आपल्या देशाचा दौरा केलेल्या इतर संघांचे उदाहरण दिले. तो म्हणाला- न्यूझीलंडची टीम इथे आली होती.