छत्रपती संभाजीनगर – कारसेवक असल्याचे तुम्हाला पुरावे द्यावे लागत आहेत, यातच सर्वकाही दडलेले आहे. ज्या व्यक्तीच्या मनात शंका निर्माण होते, त्यांनाच पुरावे सादर करावे लागतात. यामध्येच आमचे यश असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. बाबरीचा ढाचा पाडण्यात कोण पुढे होते, हे सर्वांना माहिती आहे.
त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब हे एकमेव होते की ज्यांनी यामध्ये आमचा शिवसेनेचा कार्यकर्ता असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेला या गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही, असा टोलाही दानवेंनी लगावला आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकारने गांभीर्याने निर्णय घ्यायला हवा जरांगे पाटलांची मागणी मान्य झालीच पाहिजे. यासाठी अनेक मार्ग आहेत, परंतु महाराष्ट्र सरकार आणि भाजपला मागण्या पूर्ण करायच्या आहेत की नाही? असा सवाल यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी उपस्थित केला आहे.
सरकारला समाजा समाजात भांडणे लावायची आहेत का? असा सवाल सर्वांच्या मनात आहे. आमची भूमिका कायमस्वरूपी मराठा समाजाला आरक्षण देण्याची राहिलेली आहे. मात्र, आता सरकारकडून वारंवार तारखा दिल्या जात आहेत. सरकार या मुद्द्यावर सकारात्मक असल्याचे सांगत आहे. परंतु त्यावर प्रत्यक्षात काही पावले उचलली जात आहेत का? असा सवालही यावेळी दानवेंनी उपस्थित केला.
चोराच्या उलट्या बोंबा –
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधान पाळावे, असे सांगणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्यासारखे आहे. अजित पवारांनी खरंतर जरांगे पाटलांच्या भूमिकेचे स्वागत केले पाहिजे. जरांगे पाटील मराठा समाजाविषयी भूमिका मांडतात आणि समाज त्यांच्या मागे एकवटत आहे. त्यांचा अवमान अजित पवारांनी करू नये, अशी विनंती विरोधी पक्षनेते दानवेंनी केली आहे.