Talathi Bharti : राज्यातील तलाठी भरती परीक्षेमुळे वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, आता या प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तलाठी भरतीची परीक्षा पुन्हा नव्याने तीन महिन्यात पारदर्शकपद्धतीने घेऊन ही भरती प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांसोबत ठाकरे गट रस्त्यावर उतरणार, असा इशारा देखील पाटील यांनी दिला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना कैलास पाटील यांनी सरकारकडे मागणी केली आहे. याविषयी बोलताना त्यांनी, “तलाठी भरती प्रक्रिया ही पहिल्या दिवसापासूनच संशयाच्या भवऱ्यात होती. या तलाठी भरती पेपर फुटी प्रकरणात गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत आणि आता निकाल जाहीर झाल्यानंतर गुणांमध्ये विसंगती आहे. सरकार ही परीक्षा आणि ही सगळी प्रक्रिया पारदर्शक झाली असल्याचा दावा करत असेल तर मग गुन्हे कसे दाखल झाले ? याचे उत्तर सरकारने द्यावे. सरकार या सगळ्या प्रकरणात पुरावे विद्यार्थ्यांकडून मागत आहेत हे चुकीचे असून सरकारने ही जबाबदारी घेऊन या सगळ्या मागचा मास्टरमाईंड समोर आणावा, ही आमची मागणी आहे.” असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
पुढे बोलताना कैलास पाटील यांनी, तलाठी भरतीची सगळी भरती प्रक्रिया आता रद्द करून सरकारने भरती परीक्षा घेऊन तीन महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी अशी आमची आता सरकारकडे विद्यार्थ्यांच्या वतीने मागणी आहे. अन्यथा विद्यार्थ्यांसोबत शिवसेना ठाकरे गट हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे कैलास पाटील म्हणाले.
दरम्यान, तलाठी भरती प्रक्रियेत परीक्षार्थी विद्यार्थ्यांना 200 पैकी 200 पेक्षा अधिक गुण मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आरोपात कसलेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे, अधिकाऱ्यांना भरती संदर्भात अधिक माहिती घेण्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.