राजस्थानातील काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट यांनी यांनी गेल्या काही आठवड्यांमध्ये राहुल, प्रियंका व सोनिया गांधी यांना तीनवेळा भेटले आहेत अशी माहिती सुत्रांकरवी मिळाली आहे. राजस्थानमध्ये डिसेंबर २०२३ मध्ये निवडणुका होणार आहेत. या कामाला उशीर झाल्यास पंजाबमधील परिस्थितीची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होईल, असे पायलट यांनी हायकमांडला सांगितल्याचे कळते.
जयपूर – राज्यात पुढील वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचे पुनरागमन सुनिश्चित करण्यासाठी कोणताही “विलंब न करता” मला राजस्थानचे मुख्यमंत्री व्हायचे आहे,’ असे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी सोनिया गांधी यांना सांगितले आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती मिळाली आहे. तसे न झाल्यास राजस्थानमध्येही पंजाबप्रमाणेच काँग्रेसचा पराभव होऊ शकतो, तेथे निवडणुकीच्या तोंडावर चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करण्याचा फॉर्म्युला फोल ठरला, असे देखील पायलट यांनी सोनिया गांधी व प्रियंका गांधी यांना सांगितल्याचे कळते.
गेल्या काही आठवड्यात सचिन पायलट यांनी, गांधी कुटुंबातील राहुल, प्रियंका व सोनिया गांधी यांच्यासमवेत तीन बैठका घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राजस्थानमध्ये डिसेंबर २०२३ मध्ये निवडणुका होणार आहेत. या कामाला उशीर झाल्यास पंजाबमधील परिस्थितीची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होईल, असे पायलट यांनी हायकमांडला सांगितले आहे.
यापूर्वी सचिन पायलट हे राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री होते. पण 2020 मध्ये त्यांनी पक्षाविरोधात बंड केल्याने त्यांना ही दोन्ही पदे गमवावी लागली. गेल्या दोन वर्षांत काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी पक्ष सोडला असल्याने पायलट यांनी घेतलेला पवित्रा महत्त्वाचा मानला जात आहे. काँग्रेस पक्षात राहुल गांधींचे तरुण सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांचा विचार केल्यास आता सचिन पायलट हे एकमेव नेते उरले आहेत. राहुल गांधींच्या टीममधील ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद आणि आरपीएन सिंह यांसारखे अनेक नेते आता भाजपवासी झाले आहेत.
सचिन पायलट यांनी गांधी कुटुंबाला, आपल्याला राजस्थानचा मुख्यमंत्री व्हायचं असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. 2018 च्या राजस्थान विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता. मात्र तेव्हा पायलट यांना मुख्यमंत्रीपदाची धुरा न सोपवता ती ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्याकडे सोपवण्यात आली. दोन वर्षांनंतर, पायलट यांनी त्यांच्या, 18 समर्थक आमदारांसह दिल्लीत पक्षविरोधात बंड पुकारले. तथापि, त्यांचे मन वळवण्यात आले. सचिन पायलट यांच्या बंडाने अशोक गेहलोत यांचे सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यावर आणले होते.