नगर, (प्रतिनिधी) – पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केल्याने त्यांना पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा इतर शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा. त्यांनी वापरलेले तंत्रज्ञान अवगत करून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावेत. शेतीत वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.
शेती उत्पादन वाढवावे. शेतकरी हा खऱ्या अर्थाने शास्त्रज्ञ असतो. ज्यांना पुरस्कार मिळाले. त्यांनी तंत्रज्ञानाची शिदोरी शेतकरी मित्रांना द्यावी. देशातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच हे पुरस्कार महत्त्वपूर्ण ठरतील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे म्हणाले.
राज्यात कृषी संलग्न व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व संस्थांंना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषी, भूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, उद्यान पंडित, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी ( सर्वसाधारण गट आदिवासी गट), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न आदी जिल्ह्यातील १२ शेतकऱ्यांना सन २०२३ या वर्षाचे हे पुरस्कार जाहिर झाले आहेत.
लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल. याबद्दल पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा कृषी विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विलास नलगे, उपसंचालक राजाराम गायकवाड, कृषी उपसंचालक किरण मोरे, उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव नवले,
राहुरी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश बन, डॉ. नंदकिशोर भुते, गोवर्धन ढोबे, विलास गायकवाड, अमोल काळे, सूरज पाटील, हर्षदा जगताप, प्रकाश आहेर, प्रकाश महाजन, पल्लवी लोहळ, दीपाली दरेकर, दानेश शेख, राजेश गोरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.