दुर्ग – देशात इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धत बंद करून मतदान पत्रिकेद्वारेच मतदान करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी नंदकुमार बघेल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून केली आहे.
नंदकुमार बघेल हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील आहेत. त्यांनी देशातील नागरिकांमध्ये असलेल्या दहशतीचा मुद्दाही राष्ट्रपतींकडे उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सध्या देशातील नागरिकांचे घटनात्मक हक्क हिरावून घेतले जात आहेत.
लोकशाहीचे तीन स्तंभ समजले जाणारे विधिमंडळे, न्यायपालिका व कार्यपालिका उद्ध्वस्त केली जात आहेत. नागरिकांच्या समस्यांकडे कोणाचेही लक्ष नाही. लोकांमध्ये सध्या मोठी घबराट पसरली आहे, असेही त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे. नंदकुमार बघेल हे राष्ट्रीय मतदाता जागृती समितीचे प्रमुख आहेत. मतदारांमध्ये जागृती करण्याचे काम ही संघटना करते.