नवी दिल्ली – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशातील आगामी निवडणूक 80 टक्के विरूद्ध 20 टक्के अशी होणार असल्याचे विधान केले आहे त्याला कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
उत्तरप्रदेशाच्या या निवडणुकीत धार्मिक विद्वेष पसरवण्याचे असे अनेक प्रयत्न होतील पण ही निवडणुक युवकांनी मुद्द्यांवर नेली पाहिजे, शिक्षण, बेरोजगारी हे या निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे असायला पाहिजेत असे आवाहन त्यांनी युवकांना केले आहे.
80 टक्के विरूद्ध 20 हा मुद्दा युवकांच्या धार्मिक भावना भडकवण्याचा प्रकार असून लोकांपुढील मुख्य प्रश्नांविषयी लक्ष विचलीत करण्याचा हा प्रयत्न आहे असे त्यांनी म्हटले आहे. उत्तरप्रदेशातील अन्य विरोधी पक्ष नेत्यांनीही योगींच्या या विधानावर जोरदार आक्षेप नोंदवला आहे. ही निवडणूक हिंदु विरूद्ध मुस्लिम अशा वळणावर नेण्याचा भाजप नेत्यांचा हा प्रयत्न आहे तो अत्यंत घातक आहे असे या नेत्यांनी म्हटले आहे.
प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे की भाजपच्या पाच वर्षाच्या काळात राज्याची स्थिती इतकी बिकट झाली आहे की राज्यातील शंभर लोकांपैकी 68 लोकांकडे सध्या कोणताही रोजगार नाही. युवकांनी हा विषय लावून धरला पाहिजे आणि त्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे असे आवाहन प्रियंकांनी केले आहे.