मांडवगण फराटा – घोडगंगा साखर कारखान्याला एफआरपी देताना यावर्षी प्रतिटन 376 रुपये व्याज द्यायला लागले आहे. त्यापोटी कारखान्याला 21 कोटी 54 लाख 66 हजार रुपये तोटा झाला आहे. अ वर्गात असणारा घोडगंगा कारखाना आता ब’ वर्गात गेला आहे. तरीसुद्धा घोडगंगा कारखान्याचे अध्यक्ष पवार हे विरोधक निवडणुकीला घाबरतात, असे म्हणणे म्हणजे हा ढोंगीपणाचा कळस आहे, असा हल्लाबोल ऍड. सुरेश पलांडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे घोडगंगा किसान क्रांती पॅनलच्या झालेल्या पत्रकार परिषदेत सुधीर फराटे बोलत होते. पलांडे म्हणाले की, कारखान्याला मोठा तोटा झाला असून ते सर्व शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. सभासदाच्या सर्व गोष्टी लक्षात येत असून मोठा भुर्दंड पुढील हंगामात कारखान्यावर पडणार आहे. को- जनशी सरकारचा संबध नसून त्यांचे अपयश लपवण्यासाठी ते सरकारवर टीका करीत आहेत. मागील अडीच वर्षांत तुमचं सरकार असताना वीज खरेदीचा भाव का वाढून घेतला नाही. अर्थमंत्री तुमचे असताना त्याबाबत तुम्ही पाऊल उचलले नाही.
पलांडे म्हणाले की, कारखान्याच्या तोट्यात जाण्याला स्वतः ते जबाबदार आहेत. आता राज्य सरकारकडून आगामी हंगामासाठी घेतलेले कर्ज रक्कम गेल्यामुळे पुढील हंगामाचा खर्च कसा करणार आहात, याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्यांच्या अपयशाचं खापर ते दुसऱ्याच्या डोक्यावर फोडत आहे.
सभासद त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. सर्वसाधारण सभेचे 15 दिवस अगोदर वार्षिक अहवाल वाटप करणे गरजेचे असते. परंतु अजूनही अहवाल वाटप का केले नाही. अहवाल दिला नाही तर संचालक मंडळ बरखास्तीचा नियम आहे. प्रादेशिक सह संचालक यांच्याकडे याबाबत आम्ही पत्रव्यवहार केला आहे.
शिरूर तालुका शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे म्हणाले की, घोडगंगा कारखान्याला 35 व 20 कोटी असे 55 कोटी तारण कर्ज आगामी ऊस गळीत हंगाम चालू करण्यासाठी राज्य सहकारी बॅंकेने दिले. नागरगाव येथे झालेल्या सभेत कारखान्याचे अध्यक्ष नागवडे कारखान्याला 80 कोटी मिळाले. मग आपल्याला कर्ज देताना सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे, आरोप त्यांनी केला होता. राजकीय हेतूने ते राज्य सहकारी बॅंकेची बदनामी करीत आहे.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष गोविंद फराटे, काकासाहेब खळदकर यांनी सडकून टीका केली. यावेळी शिवसेना शिरूर तालुका प्रमुख सुधीर फराटे, काकासाहेब खळदकर, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक आत्माराम फराटे, सोसायटीचे अध्यक्ष गोविंद फराटे, प्रभाकर घाडगे, बिभीषन फराटे, शरद गायकवाड, शिवसेना शिरूर लोकसभा संघटक विरेंद्र शेलार आदी उपस्थित होते.
दिशाभूलप्रकरणात गुन्हा दाखल करू –
सुधीर फराटे म्हणाले की, को- जन प्रकल्पाला उशीर का झाला याचे पुरावे सादर करावेत; अन्यथा आम्ही सभासद त्यांच्यावर चुकीचे आरोप करून सभासदांची दिशाभूल करतात म्हणून येत्या 10 दिवसांत आम्हाला गुन्हा दाखला करावा लागेल. दोन दिवसांपूर्वी जमा झालेली एफआरपी ही गेल्या हंगामातील आहे. एफआरपी देणे हा कायदेशीर हक्क आहे. एफआरपी मिळाली नाही म्हणून साखर आयुक्तांनी कारखान्याला नोटीस बजावली होती. त्यातून कारखान्याला 2 कोटी 60 लाख रुपये दंड झाला आहे.