फलटण – सर्वसामान्य आणि गोरगरिबांची दिवाळी स्वस्तात साजरी व्हावी म्हणून शिंदे- फडणवीस सरकारने ‘आनंदाचा शिधा’ वाटपाची घोषणा केली. मात्र, “आनंदाचा शिधा’ सुरवातीपासूनच वादात सापडल्याने चर्चेचा विषय बनला. एकीकडे फलटण तालुक्यात अनेक ठिकाणी “आनंदाचा शिधा’ पाकिटातून साखर गायब झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे याबाबत पुरवठा विभागाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात न आल्याने महसूल विभागावर शंका उपस्थित होत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात आनंदाचा शिधा वाटप केला जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी यामध्ये केवळ तीनच वस्तू दिल्या जात आहे. सध्या अनेक ठिकाणी रवा, तेल आणि चना डाळ या पाकिटातून दिल्या जात असून साखर मात्र गायब आहे. फलटण तालुक्यासह अनेक ठिकाणी साखर तर काही ठिकाणी तेल मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी रेशन दुकानदारांना डाळ, रवा आणि तेल द्यावे लागत आहे. साखर देत नसतानाही यासाठी 100 रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे आता नागरिकांना अंदाजे 35 ते 40 रुपये पेक्षा अधिक पैसे देऊन बाजारातून साखर विकत घ्यावी लागणार आहे. यामुळे नागरिकांना आनंदाची शिधा 140 रुपयांना पडत आहे.
साखर आली नसल्याचे प्रत्येक ग्राहकांना समजून सांगताना दुकानदारांची दमछाक होत आहे. तर अनेक ठिकाणी तुम्हीच साखर वाटप करत नसल्याचा आरोप रेशन दुकानदारांवर होत असल्याने त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. आधीच केरोनामुळे दोन वर्षे दिवाळी साजरी करता आली नाही. त्यातच अजूनही अनेकांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही. तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाल्याने ते देखील संकटात सापडले आहेत. त्यामुळे सरकारने घोषणा केलेल्या ‘आनंदाचा शिधा’ वाटपाच्या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती.
मात्र, आता सरकारची ‘आनंदाचा शिधा’ 100 एवेजी 140 रुपयांना पडत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. रवा, साखर, पामतेल, चना डाळ रेशनकार्ड धारकांना 100 रुपयात वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक दुकानात साखर पोहचली नसल्याने ही साखर नेमकी गायब झाली कुठं, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे राज्य सरकारकडून राज्यातील नागरिकांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना गायब झालेली साखर मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
रेशनिंग दुकानाची चौकशीची मागणी
फलटण तालुक्यात ज्या रेशनिंग दुकानांमधून साखर वगळून आनंदाचा शिधा दिला जात आहे त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने वाटप न करता कागदावर नावे लिहून वाटप करत असल्याने तसेच आनंदाच्या शिध्याची पूर्ण रक्कम घेत असल्याने फक्त काहीच ठिकाणी साखर का वगळली जात आहे, असा सवाल नागरिक करत असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.