सातारा – सातारा शहरात यापुढे पुणे, मुंबई येथून येणाऱ्यांना होम क्वारंटाईन न करता केवळ इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केले जाईल, अशी स्पष्ट सूचना तहसीलदार आशा होळकर यांनी केली. शहरातल्या वाढत्या गर्दीचे नियंत्रण व प्रतिबंधात्मक नियोजन ही नगराध्यक्षांच्या अंर्तगत काम करणाऱ्या कृती समितीची जवाबदारी आहे.
करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पालिकेने सुसज्ज खासगी इमारती ताब्यात घ्याव्यात, असे आदेश तहसीलदारांनी दिले. पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात तहसीलदार आशा होळकर यांनी सकाळी पालिका कृती समितीची बैठक घेतली. या बैठकीला नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, मुख्याधिकारी शंकर गोरे, उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, लेखापाल हिंमत पाटील, तसेच सर्व विषयांचे समिती सभापती व नगरसेवक उपस्थित होते.
नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या वॉर्ड कृती समितीची कामे, त्यांचे अधिकार व लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष कसे काम करावयाचे या संदर्भात राज्य शासनाने दिलेल्या सूचना काय आहेत, याची माहिती तहसीलदार आशा होळकर यांनी दिली. पुणे, मुंबई येथून सातारा जिल्हयात येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सातारा तालुक्यात 20 हजार 314 जण आले असून यातील 30 टक्के नागरिक सातारा शहरात आहेत.
वीस प्रभागातील वॉर्ड कृती समितीने पुणे, मुंबई येथून आलेल्यांची नोंद कटाक्षाने ठेवायची आहे. या नागरिकांचे होम क्वारंटाइन प्रभावी ठरत नाही. यापुढे साताऱ्यात इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केले जाईल. याचे नियोजन व व्यवस्थापन वॉर्ड कृती समितीने करावयाचे आहे.
जो क्वारंटाइन राहणार नाही, त्याला जागेवर हजार रुपये दंड करून त्याची रवानगी खावली येथे करावी, अशी सूचना तहसीलदार होळकर यांनी दिल्या. शहरातील व शहरालगतची काही सुसज्ज संकुले इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनसाठी ताब्यात घ्यावीत, अशा सूचना तहसीलदारांनी दिल्या.
सातारा शहरातील ज्या गरजू नागरिकांना रेशनिंग कार्ड नाही त्यांनी आधार कार्ड व स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र विहित नमुन्यात सादर करावे. अशा नागरिकांची शासकीय कोट्यातून धान्य वितरणाची सोय करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. वॉर्ड कृती समिती शहरात जवाबदारीने काम करेल, बाहेरील लोंढ्यांचे प्रत्यक्ष नियंत्रण प्रभावीपणे केले जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष माधवी कदम यांनी दिले .