एकेरी वाहतूक प्रश्नी खासदार श्रीनिवास पाटील यांची मध्यस्थी
सातारा – ग्रेड सेपरेटरचे काम अंतिम टप्यात आले आहे, ते काम पूर्ण होईपर्यंत शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी शहरातील पूर्वीची एकेरी वाहतूक फक्त दुचाकींसाठी सुरु करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालय ते मोती चौकापर्यंत एकेरी वाहतुकीमुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने तिथे शिथिलता आणावी, ही व्यापाऱ्यांची मागणी गेल्या तीन महिन्यापासून होती.
ग्रेडसेपरेटरचे काम पूर्ण होईपर्यंत तर एकेरी बंदच करा, अशीही मागणी होती. मात्र, गुरुवारी झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांचा एकेरी बंद करण्याचा आग्रह मोडत पोलीस प्रशासानाने पोलीस मुख्यालय ते शनिवार चौक (पाचशे एक पाटी) पर्यत फक्त दुचाकींना परवानगी देण्यात आली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी समन्वय साधत तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या.
साताऱ्यात सुरु करण्यात आलेली एकेरी वाहतूक काही महिन्यांपूर्वी पुन्हा सुरु करण्यात आल्यानंतर त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. मात्र, शहरात होणारी वाहतूक कोंडी, छोटे मोठे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने एकेरी सुरु केली. त्यावेळी विरोध झाल्याने व्यापाऱ्यांच्या सूचना व सर्व्हेनंतर राजपथावर दुहेरी वाहतूक व कर्मवीर पथावर पोलीस मुख्यालय ते मोती चौकापर्यंत एकेरी वाहतूक असा प्रयोग पोलिसांकडून करण्यात आला.
त्यानंतरही व्यापाऱ्यांमधून विरोध सुरु झाल्याने गेले तीन महिने या विषयावर बैठकांचे सत्र सुरू होते. व्यापाऱ्यांचे व्यवसाय होत नसल्याने त्यांची अवस्था बिकट झाल्याने मल्हार पेठेतील एकेरी वाहतूक बंद करण्याची मागणी व्यापारी करत होते. मात्र, त्यावर तोडगा निघत नव्हता. काही मंडळींनी खासदार श्रीनिवास पाटील यांना साकडे घातले होते.
अखेर गुरुवारी शिवतेज हॉलमध्ये खासदार पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापाऱ्यांची बैठक झाली. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, शिवसेनेचे नेते नरेंद्र पाटील, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी प्रकाश गवळी, गुरुप्रसाद सारडा, कॉंग्रेसच्या सुजाता घोरपडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत मल्हार पेठेतील एकेरी वाहतुकीस व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध करून त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीची आपबिती प्रशासनासमोर मांडली. एकेरी वाहतूक तसेच बाजारपेठेतील मंदीमुळे व्यवसाय कोलमडले असून त्यामुळे व्यापाऱ्यांना उदरनिर्वाह करणे अशक्य झाल्याची भावना व्यक्त केली गेली. प्रशासन नियमच राबवत आहे तर सुविधाही दिल्या पाहिजेत, शहरातील अतिक्रमणे काढा, रस्ते मोकळे करा, अडचणीचे ठरणारे रिक्षा स्टॉप स्थलांतरित करा, वाहतुकीला अडथळा ठरणारे हॉकर्स हटवा, पार्किंग नसणाऱ्या इमारतींवर कारवाई करा, अशा विविध मागण्या व्यापाऱ्यांसह सर्वांनी केल्या. यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी सातारा नगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराबाबत आक्षेप नोंदवत खासदार पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या.
खासदार श्रीनिवास पाटील व एसपी सातपुते यांनी सुमारे दीड तास चर्चा ऐकून घेतली. त्यानंतर सातपुते यांनी मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला तरी व्यापारी मात्र मल्हार पेठेतील एकेरी वाहतूक बंद करा यावर ठाम होते.
मात्र, वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी खासदार पाटील यांनी त्यांच्या खुमासदार पध्दतीने चर्चा मूळ मुद्यावर आणत नेमका मध्य मार्ग काढण्याची सूचना केली. त्यावर सातपुते यांनी तीन पर्याय समोर ठेवले. त्यामध्ये दोन्ही रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरु ठेवणे, मल्हारपेठेतील रस्त्यावर सकाळी 9 ते दुपारी 12 व सायंकाळी 4 ते रात्री 8 अशा वेळेत एकेरी वाहतूक तर व्यापाऱ्यांच्या मागणीप्रमाणे पोलीस मुख्यालय ते पाचशे एक पाटी रस्त्यावरील बॅरिकेटस काढून फक्त दुचाकी वाहनांना वाहतुकीची परवानगी द्यावी. यामध्ये व्यापाऱ्यांनी तिसरा पर्याय निवडला व हात वर करुन या निर्णयास मान्यता दिली.