पुणे – केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्याचबरोबर साठ्यावर मर्यादा आणल्या आहेत. मात्र, तरीही खरिपाचे पीक बाजारात आल्याशिवाय म्हणजे नोव्हेंबर उजाडेपर्यंत कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता नाही, असे बोलले जात आहे.
काही महत्त्वाच्या राज्यांतील निवडणुका होत असतानाच कांद्याचे दर वाढत असल्यामुळे हैराण झालेल्या केंद्र सरकारने स्वतःकडील कांद्याचा साठा राज्यांना दिला आहे. मात्र, तरीही देशभरात कांद्याचे दर सध्या 80 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहेत. दरम्यानच्या काळात सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य वाढवून पाहिले. मात्र, तरीही फरक पडत नसल्यामुळे सरकारने कांद्यावर निर्यात बंदी घातली आहे. त्याचबरोबर साठेबाजाविरोधात कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत.