पुणे –रस्ते अपघातातील अपघातग्रस्त व्यक्तीला तत्काळ मदत करुन त्याचा जीव वाचवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या जीवनदूतास रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालय, दिल्ली यांच्यामार्फत प्रोत्साहनपर 5 हजार रुपये बक्षीस देण्यात येते, अशी माहिती जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव तथा पुण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.
राज्यात दरवर्षी अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अपघातग्रस्त व्यक्तीस तत्काळ (गोल्डन अवर्स) रुग्णालयात दाखल केल्यास त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. त्यामुळे अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने अपघातग्रस्तास तत्काळ मदत करावी, असे आवाहन पोलीस आधिक परिवहन विभागाकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.
दरम्यान, मदत करणाऱ्यांच्या संख्येत वाढ व्हावी, या उद्देशाने परिवहन विभागाकडून ही योजना राबविण्यात येते. योजनेची माहिती https://morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून ही योजना 31 मार्च 2026 पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. मेंदूला मार लागणे, अतिशय रस्तस्त्राव होणे, पाठीच्या कण्यास मोठी इजा होणे आदी गंभीर इजा झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तीस तत्काळ रुग्णालयात दाखल करणे. अशा प्रकारची मदत जीवनदूताकडून होणे अपेक्षित आहे. जीवनदूताची निवड जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार आहे.