तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – सत्य न जाणता एखाद्याविषयी दुराग्रह बाळगू नये,असे परखड मत हभप गुलाबराव महाराज खालकर यांनी वराळे येथे व्यक्त केले. हभप शंकर महाराज मराठे यांच्या मार्गदर्शनाखालील अखंड हरिनाम सप्ताहाच्या चौथ्या दिवसाची कीर्तनसेवा हभप खालकर महाराजांनी केली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष हभप नंदकुमार भसे, हभप गणेश मोहिते, नामदेव ननावरे, सोपान साठे, नंदकुमार शेटे, हभप सीतारामबुवा मराठे, बबन मराठे, नितीन मराठे, काळुराम मराठे, ज्ञानेश्वर मराठे, शहाजी मराठे, बबनराव मराठे, अतुल मराठे, अरुण मराठे, सुनील शिंदे, दत्तात्रेय वारिंगे आदी ग्रामस्थांसह वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खालकर महाराज म्हणाले की, सत्य न जाणता एखाद्याविषयी दुराग्रह बाळगू नये. परकल्याणाकरिता कार्य करणारी माणसे वरवर पाहता कैकयीप्रमाणे कठोर दिसतात; मात्र त्यांच्या अंतःकरणात जगाच्या कल्याणाचा मानस असतो. कैकयी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मनात उत्पन्न होणारी वाईट भक्ती पांडुरंगा तुझ्या कृपेने नष्ट होऊ दे आणि माझ्या चित्तातसुद्धा मी पांडुरंगाचे चरण धरावे इतकाच लाभ मला मिळू दे, या तुकोबारायांच्या भावना होत्या.
त्याचे सार सांगताना रामायणातील माता कैकयी आणि सुमित्रा यांची उदाहरणे देत ते म्हणाले, की कौसल्याने श्रीरामाला जन्म दिला व जग दाखवले; मात्र कैकयीने श्रीरामाला जन्म दिला नसला तरी जगाला खरा श्रीराम दाखवला. कैकयी नसती तर रामराज्य झालेच नसते, असेही ते म्हणाले.