मुंढवा – केशवनगर येथील विहाना सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. येथे ठिकठिकाणी पावसाळी तळे निर्माण झाली आहेत. त्यात चिखल झाला आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. काही खासगी व्यक्तींनी येथून जड वाहनांनी मालवाहतूक करुन या रस्त्याची चाळण केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
केशवनगरमध्ये रस्त्याची चाळण झाल्याने दररोज अपघात होत आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे रविवारी सकाळी येथील नागरिकांनी चिखलामध्ये उभे राहून निषेध व्यक्त केला आणि हा रस्ता बंद केला. येथील खासगी व्यक्तींकडून नागरिकांना दमदाटी केली जात असल्याचे नागरिक सांगत आहेत. येथील विहाना सोसायटीतील महिलांनी सांगितले, “पावसाळा सुरू झाल्यामुळे या चाळण झाल्यावर रस्त्यावर पाणी व चिखल साचलेला आहे.
महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. संबंधित रस्त्याची चाळण करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाईची मागणी सोसायटीतील सर्व सभासदांनी पोलिसांकडे केली आहे. प्रसंगी पोलीस आयुक्तांकडे दाद मागण्याच्या पवित्र्यात येथील नागरिक आहेत. या समस्येबाबत माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार योगेश टिळेकर यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधला असता, ‘या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करू,’ असे त्यांनी आश्वासन सोसायटी सदस्यांना दिले आहे.