पुणे – गेल्या काही दिवसांपासून सरळ सेवा भरती प्रक्रियेतील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारण्याचा मुद्दा चर्चेत आहेत. हा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनातही गाजला. या पार्श्वभूमीवर आता भरती प्रक्रियेच्या एका जाहिरातीतील सर्व पदांसाठी एकच शुल्क आकारण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील उमेदवारांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
सरळसेवा पदभरती प्रक्रियेत प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जात असल्याने वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. याबाबत आमदार रोहित पवार यांनी मुद्दा उपस्थित केला होता. यावर अधिवेशनात चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी वित्त आणि नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. त्यात पदभरतीच्या जाहिरातीत प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शुल्क आकारल्याच्या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर पवार यांनी राज्य शासनाच्या काही विभागांनी काढलेल्या पदभरतीच्या जाहिरातीत प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारल्याचे समोर आले आहे.
रोहित पवार यांचे ट्विट
“एकाच जाहिरातीतल्या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शुल्क न आकारता एकच शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार. सरळसेवा भरतीसाठी असलेले एक हजार रुपये शुल्क उमेदवारांना परवडणारे नाही. त्यामुळे यूपीएससी किंवा एमपीएससीप्रमाणे किमान शुल्क आकारणे गरजेचे आहे. राजस्थानच्या धर्तीवर एकदाच नोंदणी पद्धत लागू केल्यास या परीक्षार्थींना दिलासा मिळू शकतो. परीक्षा पारदर्शक होत नसल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे. परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठीही उपाययोजना करणे आवश्यक आहे.”
– रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड