नाशिक – महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन जोरदार चर्चा सुरू आहे. यातच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात अजित पवार पवारांबाबत मोठे विधान केले आहे. ‘अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत, आपण त्यांना एकदा मुख्यमंत्री करु,’ असे विधान झिरवळ यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर आता स्वत: अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावर अजित पवार म्हणाले की, “अमुक एक मुख्यमंत्री झाला पहिजे असं वक्ते बोलले, पण फक्त भाषण करुन मुख्यमंत्री होतं नाही. त्यासाठी 145 आमदारांच संख्याबळ पाहिजे. ज्या पक्षाची जिथे ताकद आहे ती जागा लढणार आहे.” दरम्यान, झिरवळ यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, “नरहरी झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. मी त्यावर वेगळं मत व्यक्त करण योग्य नाही. झिरवळ साहेब, काय अजिदादा काय किंवा मी काय आम्हा सगळ्यांना याची जाणीव आहे की संख्या आल्याशिवाय तिथंपर्यंत पोहोचता येणार नाही.”
काय म्हणाले होते नरहरी झिरवळ?
झिरवळ म्हणाले की, “अजित दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे. त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांना प्रामुख्याने काम करावे लागेल. सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आपल्या पक्षाच्या निवडून दिले. तेव्हा वातावरण निर्माण होईल आणि दादा मुख्यमंत्री होतील.”
पुढे झिरवळ यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत देखील भाष्य केले. “आम्ही पहाटे दादांसोबत गेलो. पण आम्हाला मुख्यमंत्री होता आले नाही. उपमुख्यमंत्रीच झालो. त्यामुळे राष्ट्रवादीची सत्ता आणायची असेल तर त्यासाठी जास्तीत जास्त पक्षाचे कार्यकर्ते निवडूण येण्याची गरज आहे,” असे विधान झिरवळांनी केले.