पिंपरी -विजेचा खांब आणि रोहित्र यांच्या संपर्कात आल्यामुळे एकाला जीव गमावावा लागला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे दोन अपघात काळभोरनगर आणि चिंचवडगाव येथे घडले आहेत. महावितरणने मात्र यात आपली चूक नसल्याचे सांगत हात झटकले आहेत.
पहिली घटना काळभोरनगर, चिंचवड येथे घडली असून या घटनेत नितीन काशिनाथ मेलाळे (वय 34, रा. काळभोरनगर, चिंचवड) यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास नितीन यांचा हात विजेच्या खांबाला लागला. यामुळे त्यास जोरदार शॉक लागला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या नितिन यास रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. नितीन यांच्या मागे त्यांची दोन लहान मुले, पत्नी, आई, वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे. नितीन हे एका खासगी कंपनी मध्ये काम करत होते. नितिन यांच्या कुटुंबास महावितरणने 50 लाख रुपयांची भरपाई द्यावी. तसेच त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला महावितरणमध्ये नोकरी द्यावी, अशी मागणी भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दुसरी घटना चापेकर चौक, चिंचवड येथे शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. चापेकर चौकातील विद्युत रोहित्राजवळ पडलेल्या दारूच्या बाटल्या वेचण्यासाठी गेलेल्या एका भंगार वेचकाला शॉक लागल्याने तो गंभीररित्या भाजला. स्वीच ट्रीप झाल्याने तो बचावला. विद्युत प्रवाह बंद झाल्याने नागरिक त्यास बाहेर काढण्यासाठी गेले. नागरिकांनी त्यास बाजूला केल्यावर लगेच विद्युत प्रवाह सुरू झाला. यामुळे बचावासाठी गेलेले नागरिक थोडक्यात बचावले.
असंवेदनशीलतेचा कळस
महावितरणचे जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी सांगितले की, काळभोरनगर येथील घटनेत वैयक्तिक काम सुरू असताना अपघात घडला. महावितरणच्या खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरलेला नव्हता. तर चिंचवडगाव येथील घटनेत भंगार वेचक विद्युत रोहित्राच्या कंपाऊंडमध्ये शिरला होता. त्याचा हात वायरला लागल्याने हा अपघात घडला. दोन्ही घटनांमध्ये महावितरणची काहीही चूक नाही.
दोन्ही घटनांमध्ये आमची चूक नाही – महावितरण
चापेकर चौकात एका भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीला विजेचा धक्का लागल्यानंतर तेथील विद्युत पुरवठा खंडित करण्यास सांगण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश अडसूळ यांनी महाविरणच्या अधिकाऱ्यांशी मोबाइलवर संपर्क केला. मात्र त्यांनी वारंवार फोन कट केला. तसेच लॅंडलाइनवर फोन केल्यावरही तो व्यस्त असल्याचे वारंवार सांगत होते. त्यानंतर अडसूळ यांनी रुग्णवाहिकेस फोन केला. मात्र जवळपास एक तास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.