प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 5 -राज्यात गुटखा बंदी असली तरी ती कागदोपत्रीच. तुम्ही कोणत्याही पानटपरीवर जा, तेथे गुटखा मिळणारच; पण पोलीस याकडे सर्रास डोळेझाक करतात. केवळ आपण “ऍक्टीव्ह’ असल्याचे दाखविण्यासाठी पोलिसांकडून कधीतरीच कारवाई केली जाते. चाललंय तर चालू द्या, अशीच भूमिका पोलीस घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
…हे वास्तव आहे सभ्य आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुणे शहरातील. हिंजवडी पोलिसांनी नुकत्याच केलेल्या गुटखा विरोधी कारवाईतून हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. यात पोलिसांनी दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. राजन ओमकारनाथ तिवारी (वय 24), धमेंद्र सत्यनारायण रांकावत (वय 32) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 3 ऑगस्ट रोजी बाणेर परिसरातील एका पान टपरीमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून विजयसिंह जाधव यांनी काम पाहिले.
सार्वजनिक आरोग्याच्या हेतूने गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू आदींवर 2012 मध्ये राज्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही बंदी केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसते. शहरात चौका-चौकात आणि गल्लीबोळात पानटपऱ्या आहेत. या टपऱ्यांवर खुलेआम गुटखा विक्री केली जाते. याची सर्वांनाच कल्पना असतानाही पोलीस किंवा अन्न व औषध प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाही. “रोजचंच मढं, त्याला कोण रडं’ असे म्हणत या कारवाईकडे दुर्लक्ष केले जाते.
खुलेआम गुटखाविक्री होऊनही पोलीस काहीच कारवाई करीत नसल्याची वस्तुस्थिती असताना, कधीतरी एखादी-दुसरी कारवाई करून पोलीस आपण “ऍक्टीव्ह’ असल्याचे दाखवून देतात. यात संबंधित पानटपरीचालकाला “जेल वारी’ घडण्याबरोबरच आर्थिक भुर्दंडही बसतो. या कारवाईमुळे त्याच्यावर “क्रिमिनल’चा शिक्काही बसतो. असे असूनही टपऱ्यांवरील गुटखा विक्री काही थांबत नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
कोठून येतो गुटखा?
राज्यात गुटखा विक्रीबरोबरच त्याच्या उत्पादनालाही बंदी आहे. त्यामुळे घाऊक व्यापारी हा माल इतर राज्यांतून आणतात. ही वाहतूक होते, ती पोलिसांना चिरीमिरी देऊनच. गुजरात, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांतून गुटखा आणला जातो. कर्नाटकात सीमेवर गुटखा उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. तेथूनही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटखा येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कारवाईकडे डोळेझाक का?
बंदी असूनही गुटखाविक्री खुलेआम केली जात असतानाही पोलीस कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न अनेकदा केला जातो. याचे उत्तर एका अधिकाऱ्याने खासगीत बोलताना सांगितले. ते म्हणाले, आरोपीला अटक करायची, त्याला कोर्टात न्यायचे हे सारे काम करावे लागते. त्यामुळे कारवाई न केलेलीच बरे, असे वाटते. चाललंय तर चालू द्या, असे म्हणून पोलीसही यात गांभीर्याने घेत नाही.