पवनानगर – मावळ तालुक्यातील पवनमावळ भागात असलेल्या तुंग किल्ल्याच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाकडून एक कोटी ५६ लाखांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मराठ्यांच्या इतिहासात नोंद असणारा तुंग किल्ला शिवकालीन पराक्राची साक्ष देतो. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांची संख्या अधिक आहे. परंतू, मागील अनेक वर्षांत किल्ल्याची झालेली पडझड, पायऱ्यांची झालेली झीज यामुळे किल्ल्यावर सहज जाणे किंवा तिथे पर्यटन करणे शक्य होत नाही. मात्र पुरातत्व विभागाच्या उपलब्ध निधीतून तुंग दुर्गसंवर्धनाचे कार्य पार पाडता येणार आहे.
मागील तीन वर्षांपासून सह्याद्री प्रतिष्ठान मावळ मार्फत किल्ले तुंग उर्फ कठिण गडावर दुर्गसंवर्धनाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक सातत्याने किल्ले तुंगच्या संवर्धनाचे काम करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत आणि सादर केलेल्या किल्ले तुंग दुर्गसंवर्धन प्रकल्प अहवालानुसार राज्य पुरात्व खात्याकडून किल्ले तुंग (कठिणगड) वर सुरू असलेल्या दुर्गसंवर्धन कार्यासाठी १ कोटी ५६ लाख रुपये निधी मंजुर केला आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे सचिन शेडगे यांनी माहिती दिली.