नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसोबत येत्या १ एप्रिलला संवाद साधणार आहेत. देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील राजभवनांमध्ये हे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाअंतर्गत परीक्षेच्या काळामध्ये तणाव कसा हाताळावा यासंदर्भात मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
२०१८ पासून ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. यंदा त्याचं पाचवं वर्ष असणार असून हा कार्यक्रम १ एप्रिल रोजी आयोजित केला जाणार आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार,’ सर्व मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना यासंदर्भात पत्र लिहिणार आहेत. मागील ‘परीक्षा पे चर्चा’च्या कार्यक्रमांना सर्वच राज्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. तसाच प्रतिसाद यंदाही मिळावा असे शिक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ताल्कातोरा स्टेडिममधून विद्यार्थ्यांना संबोधित करणार असून देशभरातील वेगवेगळ्या राजभवानांमध्ये निवडक उपस्थितांसोबत पंतप्रधान डिजीटल माध्यमातून संवाद साधणार आहेत. मागील वर्षी करोनामुळे सरकारने हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेतला होता. केंद्र सरकारकडून निधी दिल्या जाणाऱ्या संस्थांमध्ये, वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयांमध्ये, मनुष्यबळ आणि विकास मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या संस्थांमध्ये तसेच इतर संस्थांमध्ये हा कार्यक्रम लाइव्ह दाखवला जाणार आहे.
मोजक्या विद्यार्थ्यांना राज्यपालांसोबत त्या त्या रज्याच्या राजभवानांमध्ये हा कार्यक्रम पाहता येणार असल्याचं शिक्षणंत्र्यांनी म्हटलंय. “मुलांचा ताण दूर झाला पाहिजे याबद्दल कोणाचेही दुमत नाही. त्यामुळेच मागील वर्षी सर्व राज्यांनी सहकार्य केलं,” असे प्रधान यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले