नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी केशव प्रसाद मौर्य यांना पाठिंबा देण्यासाठी एक ऑफर दिली होती. “मौर्य यांच्यात हिंमत असेल आणि 100 आमदार त्यांच्यासोबत असतील तर या, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि त्यांना मुख्यमंत्री करू.’ असे अखिलेश यादव यांनी म्हटले होते. दरम्यान, आता त्यांच्या याच ऑफरवर भाजपने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “अखिलेश यांनी आपले 100 आमदार वाचवा, ते भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे म्हणत अखिलेश यादव यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अखिलेश यांच्या ऑफरवर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले की, त्यांनी त्यांचे 100 आमदार वाचवावेत, ते सर्व भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. आमचे आमदार त्यांच्याशी कधीच भेटणार नाहीत. समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात कधीही नैसर्गिक युती होऊ शकत नाही.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही सपाचे 100 आमदार आणू शकतो पण त्यांना पक्षात स्थान मिळणार नाही कारण आम्हाला येथे गुंडांची गरज नाही. जनतेची सेवा करणारे सभ्य लोक हवे आहेत. मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, मुख्यमंत्री व्हायचे की नाही, बनवायचे की नाही हे आमच्या पक्षाचे नेतृत्व ठरवते.
केशव प्रसाद मौर्य यांना विचारण्यात आले की, तुम्ही पक्षाध्यक्ष असताना जबरदस्त विजय झाला, पण त्याचे बक्षीस दुसऱ्याला मिळाले, दुख काय आहे? त्यावर ते म्हणाले की, अध्यक्ष असताना पक्षाचा विजय झाला, हा माझा विजय नाही. देशातील माननीय मोदीजींची हीच क्रेझ आहे की त्यांच्या नावाने ईव्हीएम कमळाच्या फुलांनी भरून जातात. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यात अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेतही दोघांमध्ये शाब्दिक युद्ध झाले. सोशल मीडियावरही दोघे अनेकदा एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळते.