काल संध्याकाळी देवाशी दिवा लावताना तुझी आठवण झाली. खरं म्हणजे, तुझ्या परवाच्या भाषणाची आठवण झाली.त्यादिवशी भटकंतीत भेटलेले या विषयावर तू बोलत असताना जम्मू-लेह-श्रीनगर-पंजाब इथल्या अनेक प्रथा-लोकरिती यावर भरभरून बोललास.
काल देवाशी दिवा लावताना तू या भाषणात न सांगितलेला पण आपल्या गप्पात खूप वर्षांपूर्वी सांगितलेला एक किस्सा फार आठवत होता. त्यावेळी तू सांगितले होतेस की पंजाबमधे अनेक घरांत अशी पद्धत आहे की तिन्हीसांजेला देवाशी दिवा लावला की घराबाहेरही दिवा लावतात… आपल्याकडेही करतात की असे… तुळशीपाशी दिवा लावून मग माजघरात झोपाळ्यावर मोठा झोका घेत परवचा म्हणण्याचा आनंद आपणही लहानपणी सुट्टीत गावाला गेल्यावर लुटला आहेच की!
पंजाबमधल्या या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे दाराशी दिवा लावताना तेला-तुपाच्या दिव्याबरोबर उदबत्ती किंवा अगरबत्तीही लावतात. अशी उदबत्ती खोबणीत खोचण्याआधी घराच्या उंबरठ्यावर किंवा उंबरठ्याला ती उदबत्ती ओवाळतात… यामागची भावना स्पष्ट करताना तू म्हणाला होतास की तू याबाबत तुझ्या अनेक पंजाबी परिचितांशी, त्यांच्या घरातल्या बुजुर्ग मंडळींशी याबाबत बोलला होतास आणि त्यांनी सांगितले होते की हे सीतेची आठवण काढण्यासाठी करतात. तिने लक्ष्मणरेषेचा उंबरठा ओलांडून जायला नको होते म्हणून तर ती आठवण आहेच! पण त्याचबरोबर संपूर्ण आयुष्य सीतेने रामाला ज्या निष्ठेने साथ दिली त्याचीही आठवण किंवा स्मरण त्यात आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या कुटुंबीयांना दूर लोटून द्यायचे नाही या संकल्पनेचा उंबरठा आठवायचा, आठवत राहायचे म्हणून उंबरठ्यावर उदबत्ती… हे सीतेचे स्मरण म्हणून उंबरठ्याला उदबत्ती ओवाळणे सांगताना त्यावेळी एक बाब तू सांगितल्याचे मला आत्ताही आठवते आहे.
त्यावेळी तू म्हणाला होतास… सीतेने केवळ रामाबरोबरच वनवास नाही भोगला, तर गर्भारपणात तिचा एकटीचाही वनवास आहे की! स्वये श्रीराम प्रभु ऐकती; कुश-लव रामायण गाती हे ठीक आहे हो! त्या बिचाऱ्या सीतेचे काय? या दोन्ही वनवासात तिचा काय दोष आहे? असलेच तर तिचे निष्पाप निरलसपण आहे. हे जपणे सोपे नाही. मग पुढे म्हणाला होतास त्यावेळी… सीतेचे हे जगणे उदबत्तीसारखे आहे… आतली काडी, वरचं मेण, त्यावर विखुरलेली लाख असे सगळे ज्वालाग्राही घटक एकाच जागी आणि तरीही मंदपणे… म्हणून आपण उदबत्ती लावली म्हणतो; पेटवली नाही. असे नियंत्रित असणे कठीण…
अगदी दिवा तर विझला नाही पाहिजे; पदर पण जळला नाही पाहिजे अशातली गत! अशा या सीतेचे स्मरण म्हणजे उंबरठ्याला उदबत्ती… जिद्दीची अग्निशिखा म्हणजे द्रौपदी; तर संयमाची अग्निशिखा म्हणजे सीता. म्हणून उदबत्ती हे त्या सीतेचे प्रतीक त्यावेळेचे तुझे हे वाक्य कसे विसरणार? आणि मग त्यावरून तू पटकन म्हणाला होतास… आपण सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की पंजाबी मुली बोलायला-चालायला कितीही बिनधास्त असल्या तरी त्या कोणत्याही घरात गेल्या तरी त्या मिळून-मिसळून राहतात आणि घर तोडत नाहीत. हा या अशा संस्कारांचा परिणाम असेल. या उंबरठ्याला उदबत्ती ओवाळायचा संदर्भ आपल्याकडेही आहेच की!
संध्याकाळी शुभंकरोती म्हणताना बाहेरची लक्ष्मी घरात येवो, असे आपणही म्हणतोच की! नवीन सूनबाई घरात पहिल्यांदा येताना उंबरठ्यावरचे तांदळाच्या मापाला ओलांडूनच आत येते ना… त्या तांदूळ दाण्याना अक्षताच म्हणतात. अक्षता आणि उदबत्ती दोन्ही मांगल्य चिन्हे. पंजाबमध्ये त्याला एक अजून संदर्भ मिळतो सीमारेषेचा. तेला-तुपाचा दिवा-त्याचा प्रकाश-उजेड लांबवरून दिसतो. दिसतो; पण पोचत नाही. उदबत्तीच्या उजेडाच तसे नाही. तो फारसा दिसला नाही तरी वाऱ्यावर त्याचा सुगंध पोचतो… माझे पूर्वज, माझी वास्तू सीमारेषेपलीकडे सोडून… त्याच्यापर्यंत निदान सुवास तरी… नाहीतरी… आठवण तिन्हीसांजेलाच जास्त येते. म्हणून तर त्याला कातरवेळ म्हणतात… म्हणून उदबत्ती… अशावेळी भावनेच्या भरात नकळत उंबरठा ओलांडला जाऊ नये म्हणून उंबरठा स्मरण…
तिन्हीसांजेला उदबत्तीच का याला एक भू-राजकीय संदर्भ असल्याचेही त्यावेळी तू गप्पांत सांगितले होतेस. पंजाब-काश्मिरींनी जेवढी युद्धे-दहशतवादी कारवाया पाहिल्या तेवढ्या भारताच्या दुसऱ्या कोणत्याही प्रदेशाने पाहिलेल्या नाहीत. (याच आशयाचे गुलजार यांचे एक वाक्य परवाही तू तुझ्या भाषणात सांगितलेसच की!) आजही या भागात घोषित-अघोषित कारवाया सुरूच असतात. त्यामुळे संचारबंदी आणि प्रकाशबंदी (लॉक-आउट) हा प्रकार तिथे नित्याचा आहे. अशावेळी दिव्याचा उजेड लक्षात येतो आणि तो प्राणघातकही ठरू शकतो. म्हणून तेला-तुपाचा दिवा नको वाटला तरी उदबत्तीची अडचण वाटत नाही.
तू त्यावेळी अजून एक म्हणाला होतास… उंबरठा हे अडचणी अडवतात, त्यांना घराबाहेरच ठेवतात असं म्हणण्याची-मानण्याची आपली संस्कृती आहे. घरातल्या समस्यांची चर्चा सार्वजनिक करायची नाही हेही उंबरठा सुचवत असतो. दिवसभर ते काम उंबरठ्याने चोख पार पाडले याबद्दलची कृतज्ञता म्हणून तिन्हीसांजेला उदबत्ती. दिवसभर त्या उंबरठ्याने हे काम करावे अशी प्रार्थना म्हणून सकाळी त्यावर रांगोळी आणि फूल. आपल्या जबाबदारीची आठवण करून दिली असे मानण्याची पद्धत म्हणून उंबरठ्यावर ठेच लागली तरी त्याला नमस्कार करण्याचा आपला संस्कार!
काल तुझी आठवण आली म्हणजे हे सगळे आठवत होते. खरं तर याची जास्त आठवण येत होती. अजूनही येतेच आहे आणि मग सहजच वाटले की तुझ्या ऑफिस टूर्स म्हणजे तुझे व्यावसायिक आयुष्य आणि तुझे वैयक्तिक भावविश्व यांच्यातला उंबरठा होता का रे? असा उंबरठा की ज्याच्या भोवती तू अशा अनुभवांची (तुझ्या भाषेत अनुभूतीची) उदबत्ती. त्यावेळी तू आपल्या गप्पात हे सांगितल्यावर आपण कितीजणांनी ही पद्धत आपापल्या घरी सुरू केली ना…
चन्द्रशेखर टिळक