शरद ऋतूचे आगमन झाले आहे. हा कोजागिरीचा महिना. आकाश निरभ्र झाले आहे. थंडी हळूहळू प्रवेश करत आहे. असे म्हणतात की, ही विजयादशमीच्या दिवशी गावाच्या शिवेवर येऊन बसलेलं असतं. सीमोल्लंघनाला माणसं गेली की, शरद आणि त्यांच्यासोबत ते हळूच गावात येतं आणि हिवाळा सुरू होतो. वसंत, हेमंत ही ऋतूंची तीन नावे आपल्याकडे मुलांची ठेवतात, पण हेमंतपेक्षा वसंतची जास्त आणि वसंतपेक्षा शरद नावाची माणसे जास्त. उत्तर भारतात वसंतचं जास्त कौतुक, तर दक्षिण भारताचा शरद लाडका. अहो, बापट आडनावाच्या वसंत कवीनेदेखील ‘शरदा’वर जास्त लिहिलंय.
शरदामधली पहाट आली तरणीताठी
हिरवे हिरवे चुडे चमकती दोन्ही हाती
शिरी मोत्यांचे कणिस तरारून झुलते आहे
खांद्यावरती शुभ्र कबुतर झुलते आहे
ही शरदातली पहाट… इंदिरा संतांना शरदातली दुपार भावली-
ही निळी पांढरी शरदातील दुपार
तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार
दाटली साय की स्निग्ध शुभ्र आकाशी
फिरतात तशा या शुभ्र ढगांच्या राशी
मला शरद ऋतूतलं सर्वांत काही प्रिय असेल, तर निरभ्र-निळ्या आकाशात उमलणाऱ्या शुभ्र ढगांच्या राशी. निळ्या-निळ्या पार्श्वभूमीवर खुलणारा शुभ्रतेचा महोत्सव. “बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात’ या ओळीतही हाच महोत्सव आहे. “शरदागम’ या अनिलांच्या कवितेची सुरुवात “आभाळ निळे नि ढग पांढरे’ अशी आहे. बापुड्या कवींनो, छातीवर हात ठेवून प्रामाणिकपणे सांगा- तुम्हाला आकाश निळेशार खरोखरीच दिसले आहे? वाहनांचा, गिरण्यांचा, कारखान्यांचा आणि त्यांच्या हजार प्रकारच्या वायूप्रदूषणाचा प्रचंड मोठा थर तुमच्या डोळ्यांवर असतो. तो पार करून, त्याही पलीकडचे खरेखुरे निळेशार आकाश या जमिनीवर राहून एकविसाव्या शतकात कुणी तरी पाहिले आहे काय?
मी पाहिले आहे. वयाच्या पासष्टाव्या वर्षी. पण एकदाच पाहिले आहे. चेन्नईहून सिंगापूरला केलेल्या आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या विमानप्रवासात. ढगांच्याही वर जाऊन ढगांचे सौंदर्य पाहण्याचा अननभूत आनंद मी अनिमिष नेत्रांनी सलग पाच-सहा तास उपभोगला आहे. ती डोळ्यांत साठवलेली दृश्ये मी अजूनही विसरू शकलो नाही. ढगांची शुभ्रता एवढी चमकदार असू शकते, ढगांचे आकार एवढे वैविध्यपूर्ण आणि सुंदर असू शकतात, यावर एरवी माझा विश्वास बसू शकला नसता. ऑक्टोबरपासून जूनअखेरपर्यंत असाच सोहळा आकाशात रंगत असेल?
मला मान्सूनची आठवण झाली. मान्सूनचे करुणाघन कोणत्या दिशेने आणि कसे येत असतील… त्यांचे येणे विमानातून पाहणे केवढे सुखद असेल, याचा किंचित प्रत्यय याच प्रवासात मला एका ठिकाणी आला. कारण तिथे मी इंद्रवर्तुळ पाहिले. इंद्रधनुष्य तर नेहमी पाहतो, पण हे दिसलेले इंद्रवर्तुळ केवळ अवर्णनीय होते! कोणत्या शब्दांत ते मी सांगू? या प्रवासात सहस्ररश्मींनी ढगावर प्रक्षेपिलेली तेज:पुंज शुभ्रता कशी शब्दांकित करू?
तुमच्या-माझियामध्ये “सेतू’ झालेली ही शरदाची पहाट पाहायला, आता पुन्हा जमिनीवर उतरू. एखादी जादू व्हावी, असे वातावरण शरदामुळे बदलले आहे. पावसाने, पुरामुळे पाण्याला नदी-नद-नाल्यांना आलेला गढूळपणा गायब होऊन पाणी नितळ झाले आहे! तो कोणता खास शब्द? हं, पाणी निवळशंख झाले आहे! हिरव्या रंगाचे साम्राज्य सर्वत्र धरतीवर पसरले आहे. कवी अनिलांना दिसते की, जलाशयाच्या काठावर उभ्या राहून बाभळी खाली वाकून आपले सावळे रूप न्याहळताहेत. टवटवलेली सगळी शेते ‘ज्वारीच्या कुसेत’ अधीर होत तान्ह्या कणसाचा टपोर गर्भ पानांच्या आडोशाला सांभाळताहेत. अजून कापूस का फुलला नाही, हे पुसायला निळे तास पक्षी पंख हलवीत जमिनीवर उतरू पाहताहेत. या साऱ्या सौंदर्यदर्शनात आपली हजेरी लावावी, असे शेवंतीलाही वाटते. पण कवी अनिल म्हणतात, अजून गवते पिवळी पडलेली नाहीत. (त्यांचे सोने झालेले नाही.) तेव्हा तू आपल्या पिवळ्या फुलांची एवढ्यात घाई करू नकोस. आपणही या शेवंतीला डिसेंबरात भेटणार आहोत, आत्ताच नाही.
गेल्या चार महिन्यांपासून रानफुलांनी कास पठारावर जो पुष्पोत्सव साजरा केलाय, त्याचा या महिन्यात समारोप. या पुष्पोत्सवात कास पठारावर शेवटी-शेवटी दिसणारे फूल म्हणजे चिमिन श्वेता असेही याचे एक नाव आहे. शास्त्रीय नाव आहे थुनबर्जिया फ्रॅग्रन्स. त्याला कुठलाही गंध नसतो, असते फक्त रंगांची शुभ्रता. डॉ. संदीप श्रोत्री यांनी यथार्थपणे म्हटले आहे की, कितीही पंचपक्वान्नाचे जेवण असू देत, शेवटी दहीभात खाल्ला नाही, तर ते अपूर्णच ठरते. त्याचप्रमाणे पुष्पपठार कास पुनःपुन्हा बघताना, इंद्रधनुषी रंगांची उधळण अनुभवूनसुद्धा पोट भरत नाही. त्यासाठी मग शेवटी दहीभाताचे फूल (हे चिमिनचे नवे नाव) नजरेने आकंठ प्यावे लागते.
ऋतुचक्रात आतापर्यंत आपण अनेक फुले पाहिली, पण रानफुलांचे सौंदर्य आणि वैशिष्ट्य खरोखर काही औरच आहे. विल्यम ब्लेक म्हणतो,
सारे विश्व सामावले एका रेतीच्या कणात
एका रानफुलामध्ये अंतर्भूत स्वर्ग सात
उभा आकाश तुम्ही तोलाल या ओंजळीत
आणि एका तासामध्ये सामावे काळ अनंत
परंतु या रानफुलांकडे पाहायला आपल्याजवळ श्रीकांत इंगळहळ्ळीकरांची आशिकी नजर हवी. नुसती नजरच नाही, तर हे सौंदर्य टिपण्यासाठी त्यांची सुंदर शब्दकळा नि शैली हवी. बघा, ऑक्टोबरातल्या कास पठारावरील पुष्पसौंदर्याचं त्यांनी कसं आरेखन केलं आहे- शरद ऋतूतल्या स्वर्गीय पुष्पसोहळ्यावेळी कास पठारावर जो आसमंत उतरतो, त्याची नेमकी कल्पना येण्यासाठी ही चित्रं आणि वर्णनं तोकडी पडतात.
– विश्वावसू काशिकर