तसं मागच्या काळातलं म्हणजे विवाह समारंभाचा “इव्हेंट’ आणि मंगल कार्यालयाचा “बॅंकेट हॉल’ किंवा वेडिंग हॉल झाला नव्हता त्या काळातलं हे लग्न…
आमचे सख्खे शेजारी दौलतराव यांच्या घरातलं ते पहिलंच कार्य. त्यामुळं लग्नाला जाणं भाग होतं. मी आणि आमचं “कुटुंब’ …(त्याकाळात “फॅमिली’ला कुटुंब म्हणायचे) म्हणजे लग्नाला जायचं म्हणून “नऊवारी’ नेसलेली सौ. आणि नवीन हाफ पॅंट घातल्यामुळे (पूर्वी हाफ पॅंट फक्त लहान मुलं आणि आरएसएसवाले घालत असत. आजकाल ती पेंन्शनरपर्यंत पोहोचलीय) खूश असलेले आमचे चिरंजीव, टो करून घाईनं मुहुर्तावर पोहोचलो होतो.
मुहुर्ताची वेळ असल्यामुळे हॉल तुडुंब भरला होता. कार्यालयाच्या दारात फेटा बांधून अक्षता वाटण्यासाठी उभ्या असलेल्या मुलीच्या आते की मामेभावाला विचारलं, “अजून उशीर आहे का? नाही म्हणजे, मुहुर्ताची वेळ झालीय म्हणून विचारतोय.’
लग्नाचा निमंत्रणपत्रिकेत छापलेला मुहूर्त हा छापलेल्या वेळेनंतर पाहिजे त्यावेळी लग्न लावण्यासाठी असतो अशी एक आपल्याकडे पूर्वापार समजूत असावी.
“नवरा मुलगा देवदर्शनाला गेलाय’, समोरून नटून थटून आलेल्या कुठल्या तरी “शकु’कडे पाहात पाहात अक्षता माझ्या तळहातावर ठेवत तो म्हणाला.
नवऱ्या मुलाचा हा देवदर्शनाचा कार्यक्रम ऐन मुहुर्ताच्या आधी का असतो हे एक मला नेहमीच पडलेलं कोड आहे. कारण “देवदर्शन’ म्हणजे देवाचं दर्शन दोन मिनिटं आणि घोड्यावर बसलेल्या वराच्या मित्रांचं आणि त्यांच्याकडच्या बायकामुलींच “नृत्यकलादर्शन'(?) कमीतकमी तासभर. आणि आता उशीर होणार म्हटल्यावर मंडपातल्या आजूबाजूच्या पाहुणे मंडळीच्या गप्पा सुरू झाल्या.
आपल्या मुलाचं लग्न ह्यापेक्षा किती थाटात झालं हे माधवराव कुणालातरी कौतुकानं सांगत होते, तर पलीकडे महिला मंडळात वधूची पैठणी बालगंधर्व की महाराणी यावर अभ्यासपूर्ण चर्चा चालली होती. (लग्नासाठी मुद्दाम नऊवारी शालू नेसून आलेली माझी बायको त्यात हिरिरीने भाग घेत होती हे सांगायला नकोच)
बाकी लग्न समारंभात सनई वाजंत्रीवाल्यांना गंगा यमुना डोळ्यात उभ्या का आणि बॅंडवाल्यांना बहारो फूल बरसाओ… आया है… या दोन गाण्याशिवाय दुसरं कोणतंही गाणं वाजवलं तर “घरात घेणार नाही’ अशी त्यांच्या बायकोची सक्त ताकीद असावी की काय, अशी मला शंका आहे.
ह्या सनई वाजंत्रीवाल्यांना कोणीही आणि कधीही “वाजवा आता…’ म्हणायचाच अवकाश… त्यांचं “गंगा यमुना डोळ्यात उभ्या का…’ लगेच सुरू होतं. आणि ह्या गाण्याचा एकच सूर जास्तीतजास्त बेसूर वाजवत ते सांगणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणत असतं.
बॅंडवाल्यांना मात्र त्यांचं फेवरिट गाणं एकदाच “वाजवायचं’ असतं …पण त्यातही त्यांना इतकी घाई असते की “तदेव लग्नं सुदिनं तदेव…’च्या आधीच त्यांचं “बहारो फूल बरसाओ…’ सुरू होतं आणि सात फेरे घ्यायच्या आत ही बहरलेली फुलं कोमेजून गेलेली असतात.
दीड वाजून गेला होता आणि आलेल्या सगळ्या “इष्टमित्रां’च्या पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली होती.
इतक्यात देवदर्शनाला गेलेली बारात आली असं कुणीतरी सांगतलं आणि “आली… लग्नघटिका समीप नवरी…’ म्हणत गुरुजींनी अंतरपाट शोधायला सुरू केली.
अशा त्या नसलेल्या मुहुर्तावर एकदाचं लग्न लागतं आणि इतका वेळ कशाबशा सांभाळून ठेवलेल्या (आणि हातात शिल्लक राहिलेल्या) अक्षता वधूवराच्या दिशेने एकदाची टाकून (नाहीतरी ती दुसऱ्याच्याच डोक्यावर पडत असतात) सगळ्या पाहुणे मंडळींनी “मिष्टान्नं इतरेजन:’ या उक्तीप्रमाणे
जेवणाच्या मंडपाकडे धाव घेतली…
इकडे निमंत्रणपत्रिकेत “आहेर स्वीकारला जाणार नाही… तुमची उपस्थिती हाच आहेर!’ अशी “प्रेमाची’ विनंती असूनही स्टेजवर अहो… कशाला कशाला म्हणत “आहेर’ देणंघेणं चालू झालं होतं.
भूक लागलेली असल्यामुळे मीही मुलाला घेऊन जेवण्याच्या मंडपाकडे निघालो… कार्यालयाची उजव्या बाजूची लांबट भिंत आणि कंपाउंड यांच्यामध्ये असलेल्या मोठ्या पॅसेजमधे हा बांबूचा कापडी मंडप टाकलेला होता. आम्ही तिथं पोहोचेपर्यंत दोन्ही बाजूनी ओळीनं मांडलेल्या जेवणाच्या अर्ध्या अधिक आसनपट्ट्या भुकेल्या पाहुणे मंडळींनी आधीच भरून गेलेल्या होत्या. कशी बशी आम्ही एका आसनपट्टीवर जागा मिळवली आणि तेथून त्या जेवणावळीतली एकेक “नमुनेदार पात्र’ यायला सुरुवात झाली… पहिल्यांदा पत्रावळी आणि द्रोण देणारा आला. ही पत्रावळ म्हणजे पळसाच्या पानांच काड्यांनी बनवलेलं ताट आणि द्रोण म्हणजे तशाच पानांची वाटी आणि हा पत्रावळवाला पत्रावळीची एक तरी काडी निघालीच पाहिजे अशा कौशल्यानं ती आपल्या समोर फेकून जात असतो. मग अशा “काडीमोड’ झालेल्या त्या पत्रावळीला कोणताही द्रवपदार्थ मग निषिद्ध असायचा.
मंडपात “ओपन एअर’ व्यवस्था असल्यामुळे ही पत्रावळ कधी उडून जाईल याचा नेम नव्हता… त्यामुळे पत्रावळीत भाताचा ढीग पडेपर्यंत तिला हातानं धरून ठेवायला लागायचं… त्यात पुन्हा अर्धा भात द्रोण कलंडू नये म्हणून द्रोणाखाली “सेटिंग’ करण्यात गेलेला… त्यामुळे जेवायला अर्धाच भात शिल्लक आणि मग “वाढपी’ नावाची जमात एका मागोमाग एक अंगावर यायची. आधी मीठवाला, मागे चटणी कोशिंबिरीच पंचपात्र, वरणवाला तूपवाला (म्हणजे तीच माणसं पुन्हा पुन्हा) अशी ही मंडळी “वंदे भारत’च्या स्पीडनं ते पदार्थ पत्रावळीत मोकळी जागा असेल तिथं वाढत (खरं म्हणजे टाकत) पुढे जायची… त्यामुळं मीठ पत्रावळीच्या मध्यभागी स्प्रे केल्यासारखं पसरलेलं.
भातावर वाढलेलं वरणानं भात सोडून अख्ख्या पत्रावळीत अतिक्रमण केलेलं…
चटणी कोशिंबीर “वरण’मय होऊन त्यांच “अन्न हे पूर्णब्रह्म’ झालेलं. त्यात वाढप्यांच्या कौशल्यामुळे आमटीनं भरलेला द्रोण कलंडून आमटीचा एक मोठा ओघोळ फाटक्या पत्रावळीतून खाली फरशीवर आणि तेथून थेट माझ्या पॅंटपर्यंत येऊन पोहोचलेला. जिलेबीनं खाली पसरलेल्या मिठाशी सख्य केल्यामुळे “खारट जिलेबी’ हा नवीन पदार्थ जन्माला आलेला तर द्रोण संपल्यामुळे आमटीच्या द्रोणात वाढलेला मठ्ठा आणखी “मठ्ठ’ झालेला. पण या कशाचीही पर्वा न करता जेवायला दोन तास उशीर झालेली पाहुणे मंडळी ते “पूर्णब्रह्म’ आधाशीपणे आपल्या पोटात रिचवीत होती.
इतक्यात यजमान असलेले दौलतराव चेहऱ्यावर कृतार्थ झाल्याचा भाव घेऊन प्रत्येक पानापुढे हात जोडून आदरातिथ्य करीत होते. सावकाश होऊ द्या बरं का… आणि काही पाहिजे असेल ते मागून घ्या… अरे… जोशीसाहेबांना मठ्ठा आण रे..! (शेवटचं वाक्य वाढप्याला उद्देशून) आणि मग पाहुणेही दौलतरावांच्या आदर आणि प्रेमापोटी जेवण छान आहे हं… असं द्रोणातला मठ्ठा ओरपित कौतुकानं सांगायचे…
जेवणं संपत येणार एवढ्यात पंक्तीत वाढण्यासाठी नवरा नवरीचं आगमन होतं आणि मांडवात पुन्हा उत्साह पसरतो. एका कोपऱ्यात बसलेल्या नवरदेवाच्या मित्रांच्या ग्रुपची चिडवाचिडवी आणि हास्यविनोद सुरू होतात. “वैनी.. नाव घ्या.. नाव घ्या. त्याशिवाय तुमच्या नवऱ्याला आम्ही इथून सोडणार नाही.’ कुठलातरी मित्र ओरडतो.
दोनतीन वेळा आढेवेढे घेत आणि जास्तीत जास्त लाजत नव्या “वैनी’ नाव घेतात.
“मटनात मटन… कोंबडीच मटन..
अरुणरावांच्या शर्टला “हडका’चं बटन!’
अख्खा मंडप मग हास्य कल्लोळात बुडून गेला होता. पंगत उठवायला सुरुवात होऊन लग्न समारंभाची सांगता जवळ आली होती. पण मी मात्र जिलेबीचा तुकडा त्या हाडकासारखा घशात अडकल्यामुळे वाढप्याला पुन्हा पुन्हा पाणी मागत होतो…
– कृष्णकेशव