पुणे – केंद्र सरकारला वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणारा त्याचबरोबर सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा वाहननिर्मिती हा उद्योग आहे. देशात तयार होणाऱ्या मोठ्या व्यावसायिक वाहनांपैकी 50 टक्के वाहनांची निर्यात होते. वाहननिर्मिती क्षेत्रात भारत चौथ्या स्थानावर पोचला असून आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत या उद्योगाचा वाटा फार मोलाचा ठरला असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
शहरात वाहन उद्योगाबाबत एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जुनी वाहने भंगारात काढण्याचा धोरणाचा सकारात्मक परिणाम या उद्योगावर झाल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, आज देशात नोंदणीकृत सुमारे 35 कोटी वाहने आहेत. दररोज त्यात भर पडत असून परिणामी इंधन आयातीवरील खर्च वाढत आहे, प्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहे. ते रोखण्यासाठी या उद्योगाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतानाच इथेनॉल, मिथेनॉल, जैव इंधन, हायड्रोजन आणि विजेसारख्या प्रदूषणमुक्त इंधन प्रणालीचा उपयोग होईल, अशी वाहने तयार केली पाहिजेत.
त्यादृष्टीने भारतात खूप चांगले संशोधन देखील सुरू आहे. देशातील सार्वजनिक वाहतूक सेवा लवकरच विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या माध्यमातून देण्याच्या दृष्टीने धोरण आखले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषी मालाच्या कचऱ्यापासून जैविक इंधन बनवण्याचे उद्योग आज देशात उभे राहत आहेत. शिवाय फ्लेक्स इंजिन निर्मितीत देखील भारताने चांगली प्रगती केली आहे. मात्र, त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर हा उद्योग लवकरच देशातील पहिल्या क्रमांकाचा बनेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.