भाग – 3
शेम्बड्या,घोडे उर्फ चतूर किटक आकाशात गर्दी करून पावसाची वर्दी द्यायचे अन् हत्तीचे काळे काळे ढग विजांच्या प्रचंड गडगडाटात हजेरी लावायचे. उतरा झरझर झरायच्या. निवळसंख ओढे, ओघळी खळखळ वाहत असत. शेते जीव्हळून पांदीतून पाणी वहात असे. शेतातली कारळाची पिवळीधम्मक फुले वाऱ्यावर डुलत ती बघताना डेफॉडील्स ही कविता मनात रुंजी घालायची. हिरव्यागार साडीला पिवळी किनार लावल्यासारखी कारळाची फुले बघतच राहावी वाटायची.
सूर्यफूले एकेका पाकळीने उमलू लागत. उमललेल्या पिवळ्याजर्द फुलांचा थाट काय वर्णावा? अहाहा! शेताची शोभा बघायला एक जन्म अपुराच पडावा. भुंगे, मधमाशा फुलांना रात्रंदिन मिठी मारून बसत. जुंधळा हुरड्याला येई. ठिकठिकाणी शेकोटी पेटवून हुरडा भाजला जाई. टपोरी कणसे खुडून आगीवर खरपूस भाजून सुपात चोळून पाखडून त्यावर चटणी मीठ टाकून केलेला चविष्ट हुरडा शेतकऱ्याच्या घरात हमखास असे.
मक्याच्या कणसात दूध भरलेलेअसे. उकडून, भाजून, सोलून, गरम फुपुट्यात खरपूस भाजलेली, वाफवलेली कणसे पोटभर खायला मिळत. भूमीपूजनाला धपाटी, कढी, वडी, कडाकणी, बाजरीचं उंड, भेंडी, दही भाताचा नैवेद्य शेताला दाखवला जाई आणि शेतात पंगती पाडून सहभोजन केलं जाई. काढणीला आलेली पिकं काढायची धांदल सुरू होई.
सरत्या अश्विनात आणि निघत्या कार्तिकात डासं वारं भिरभिरत असे. आकाश निरभ्र झालेले असे. डास्या वाऱ्याने त्वचा तटतटू लागायची. थंडीची चाहूल लागायची. भुईमुगाची पाने काळपट तपकिरी रंगावर यायची. उंच उंच जोंधळ्याच्या डोलत्या पिकांवर पाखरांचे थवे भिरभिरायचे. मचाणी बांधल्या जायच्या, गोफणी तयार व्हायच्या. म्हातारे कोतारे, तरणे शेतावर वस्ती करत, कुणी पहाटेच उठून पाखरं राखायला जायचे. शेताशिवारातून हाकाट्यांचे आवाज, रिकाम्या डबड्यांचे आवाज घुमू लागत. पावसाने उकणून गेलेल्या खळ्यांची डागडुजी होई.
कार्तिकच्या मध्यावर किंवा शेवटी गाव ओस पडत. खुडणी कापणीला जोर येई. कणसं खुडायची, जोंधळा पाडायची एकच धांदल उडायची. धारदार विळे बोट कापत तर कधी पायात सड घुसत. आसपासच्या औषधी पाल्याला चुरून रस काढून जखमेवर लावून चिंधकाची एखादी दशी काढून पट्टी बांधली जाई. शेंगा काढणीला नांगराची तजवीज आणि तोडणीला बायका, पोरांना शेंगाच्या रोजावर बोलवायची धांदल उडे. शेंगांचा सॉड (उतार) बघून एकूण गोळ्यांची संख्या ठरे.
जितका उतार जास्त तितकी गोळ्यांची संख्या जास्त. 14,18,20 अशा संख्येत गोळे ठरायचे.दिवसभर रोजगाऱ्याने तोडलेल्या शेंगांचे समसमान गोळे करून त्यातला एक गोळा म्हणजेच पाटी, अर्धी पाटी किंवा दीड पाटी शेंगा दिवसभर शेंगा तोडणाऱ्यास मिळत.दिवसभर नांगरलेल्या शेतातले वेल वेचणे, ढीग घालणे मग शेंगा तोडायच्या. मोकळ्या झालेल्या वेलांचे शेतकरी जागोजागी दाबूनआढवं घालत. माणसांच्या आवाजाने राने गजबजून जात.
मागतकरी झोळ्या घेऊन राना-रानातून हिंडत. कुणाच्या शेतातून शेंगा, कुणाच्या शेतातून कणसे मागत हिंडत. बऱ्याचदा कणसांची चोरी व्हायची, कधी तोडून ठेवलेल्या शेंगांचीही चोरी व्हायची म्हणून लोक शेतावर वस्ती करत. पांढऱ्याखड शेंगा पोतीच्या पोती भरून गाडीतून घरला येत. खळ्यात मोत्यासारख्या धान्याची रास पडे. धान्याच्या पोत्यांच्या थप्पी जोत्यावर येऊन पडत. जेवढी थप्पी मोठी तितकी शेतकऱ्यांची छाती अभिमानाने फुलून येई.सहा-सात महिने रात्रंदिन गाळलेल्या घामाचे चीज होई आणि उरलेल्या कामाची लगबग होई.
जोंधळ्याच्या पेंड्यांची वासुदेवाच्या टोपीसारखी बुचाडे लागत, शेंगांचे भुस्काट निवाऱ्याला बसे. तुरीच्या शेंगा गडद तपकिरी होत. पाला पाचोळा वेचून जनावरांपुढे पडे. तूर मटकी काढून झाली की खरिपाचा हंगाम संपे. खरिपाची सुगी माणसांच्या आणि गुरांच्या वर्षभराच्या पोटा पाण्याची सोय करे. खरीप जोमात असला की शेतकऱ्याच्या पदरात भरभरून माप पडे.
दिवाळी झाली की बैलांना जरा विश्रांती मिळायची. रब्बीसाठी शेत गहू, शाळू, हरभरा, करडा, जवस आदींची जुळवाजुळव व्हायची. बी राखेतच असायचे, कोण उधार उसणवार आणायचे. रब्बीसाठी कुणी कुणी बेवड राखायचे. बेवड म्हणजे शेतात सहा महिने कोणतेच पीक घ्यायचे नाही. सारखी पिके घेतल्याने जमीन थकते, निकस होते, मरगळते म्हणून तिला विश्रांती द्यायची म्हणजे पुढचे पीक जोमात येते.
दिवाळी झाली की रब्बीच्या पेरणीला सुरुवात व्हायची. संक्रातीला गव्हाच्या ओंब्या टचटच भरायच्या. हरभऱ्याचे घाटे भरायचे.
करड्याच्या लालसर पिवळ्या छटेच्या फुलांनी शेते नटायची. त्यांचा दरवळ शेतातून घमघमत असायचा. पावट्याच्या, घेवड्याच्या पाट्यांवर पांढऱ्या फुलांच्या घोसांच्या जागी शेंगांचे भरगच्च तुरे डोलू लागत. शेंगांचा गर्द घनदाट वास शेतातून दरवळत राही. नुसत्या चटणी मिठाच्या देशी चुनुल्या पावट्याच्या कालवणाची चव जिभेवर दिवसभर रेंगाळत राही. घरोघरी पावट्याच्या शेंगा, ओल्या हरभऱ्याचे कालवण असायचे. पोरंठोरं ओल्या हरभऱ्याच्या डहाळ्यांवर तुटून पडत. शेकोटीत हावळा भाजला जाई.
बोरे, घाटे, पावट्यांनी संक्रात भरभरून जाई. मूद पुनवला ज्याचा त्याचा कुलस्वामी पारधीला जाई. जत्रा, यात्रा उरूस, पावणे पै आनंदाला उधाण यायचं. बघता बघता होळी येई आणि पिके पिवळी पडत. ऊन रणरणत असायचं पण आत्तासारखं ते जाळून काढत नव्हतं. गहू हरभरा कापणीला येई. कुणी चांदण्याने, कुणी पहाटे लवकर गहू काढायला जाई. (उन्हाच्या रटात ओंब्याची टोके हातात जोरात घुसतात म्हणून उन्हाच्या आधीच गव्हाचे काड कापले जातात) हरभरा उपटून जागोजागी कडवं रचली जात. गव्हाचे काड कापून पेंढ्या बांधल्या जात. करडा कापून कडवं रचली जात. शाळूच्या कडप्या ऊन खात पडत. फाल्गुनाच्या मध्यावर किंवा शेवटी रब्बीचे धान्य घरात येऊन पडे आणि शेतकरी सुस्कारा टाकत, जरा निवांतपणा येई. गजबजलेली शेते ओस पडत.
(क्रमशः)
– सुचित्रा पवार