1980 मधील मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम मुलाच्या बिऱ्हाडी चालू आहे. मुलगा आणि मुलगी आपापल्या देहबोलीनं अनुकूल प्रतिसाद दाखवत आहेत. संभाव्य सोयरे जसजसा कार्यक्रम पुढं सरकतोय तसतसे लग्न ठरविण्यासाठी कशीकशी बोलणी करायची या विचारात मौनात गेलेली. यामुळं मध्यस्थ व्यक्ती आपलं महत्त्व राखण्यासाठी उगाच काहीबाही बोलून वातावरणात शब्द सांडत बसलेली. कुणीतरी जाणता सल्ला देतात, “मी काय म्हणतो मुलाला आणि मुलीला जरा मोकळेपणाने बोलण्यासाठी गल्लीच्या तोंडापर्यंत फिरून येऊ द्यात का?’
पडत्या फळाची आज्ञा मानून अधीर जोडी बाहेर पडते. दोन्ही भावी सोयऱ्यांना आपल्याला हे आणि असं विचारायचं आहे याची उजळणी केलेली वाक्य उच्चारायची संधी मिळते.
मध्यस्थ थोडंसं खाकरतो तेव्हा सोयरे एकमेकांना तोंड आणि गळाभर हसून भिडतात. त्या घराला थोडा सरावलेला वधूपिता खोटा संकोच दाखवत विचारतो, “समीररावांना पगार किती आहे?’
वरपिता अभिमानानं आकडा सांगतात आणि नजर भिंतीवर विराजमान वाडवडिलांच्या तसबिरी वरून काढून मनाशी म्हणतात आपण आकडा सांगताना वरकमाई… नाही सांगितली ते बरं झालं, आपल्याला तरी खरा आकडा कुठं ठाऊक आहे!
आकडा ऐकताच वधुपित्याच्या चर्येत भराभरा फरक पडतोय, हे मध्यस्थ ओळखतात आणि म्हणतात, “दिलीप मला वाटतंय की…’ मध्यस्थांच्या बोलण्यात घाईघाईनं घुसत वधूपिता मुलाच्या कमाईच्या आकड्यातून दोन हजार वजा करून आपल्या मुलीचा पगार सांगतात. आपल्या पत्नीच्या वासलेल्या तोंडातून खरा आकडा बाहेर पडू नये अशी प्रार्थना करतात. कारण गेल्या आठवड्यातच मुलीचा पगार वाढून आता मुलाच्या ऐकलेल्या पगारापेक्षा तो चार हजारानं जास्त आहे हे सत्य त्यांना लपवायचं असतं.
समाधानानं उठत मध्यस्थ आपण कामगिरी चोख बजावली म्हणत आपली पाठ थोपटतात. लग्न उत्तम पार पडलं. सून मनाजोगती मिळाली… पुन्हा मिळवती आहे. घर आनंदात न्हातयं. एक दिवस मुलगा चेहरा पाडून घरी येतो आणि घरात सांगतो, हिला माझ्यापेक्षा इतका तितका पगार जास्त आहे. थुईथुई नाचणारं घर शांत होतं. ती मुलगी आपली सगळी बाईपणाची कर्तव्य उत्तम पार पाडत असूनही घर घरघर लागल्यासारखं होत जातं. गेले सहा महिने व्याव्ह्यांचं होणारं स्वागत गट्टिफू झाल्यासारखं पाठ फिरवून बसतं.
ती मुलगी परीक्षा देऊन आणखी वरवर चढतीय आणि मुलगा आहे त्याच पदावर म्हणजे कनिष्ठ स्थापत्य अभियंता पदावर दिवस काढतोय. दोघा नवरा बायकोत सुसंवाद नाही. यालाही दोन वर्ष होत आलेली. एक दिवस एक अल्पशिक्षित ठेकेदार या कनिष्ठ अभियंत्याला म्हणतो, “रावसाहेब,एका खात्यात माझी कामं चाललीत, तिथला इंजिनेर लै वाईट हाय. तुमी येकवार शाईटवर येऊन बीलाचा आकडा काढून द्याल का? बीलामाग अर्धा टक्का देईन.’
एका ठेकेदाराचं काम स्वीकारताच आणखी ठेकेदार बोलणी करायला लागले. बघता बघता काम वाढत गेलं. एकीकडं पदोन्नतीमुळं तिला पगारवाढ तर दुसरीकडं बीलं करायला मदत मागणाऱ्या ठेकेदारांची वाढती संख्या असल्यानं आपल्याला बढती मिळत नाही याचं वाटणारं वैषम्य पातळ होत चाललेलं. त्याला एकट्याला काम उरकेना तेव्हा त्यांनी चारदोन अभियंते कामावर ठेवले.
थोड्या फरकानं दोघेही निवृत्त झाले. ती आता पूर्णवेळ गृहिणी झाली तर त्यांनी आपला व्याप दुप्पट केला. एका निवांत संध्याकाळी दोघे गप्पा मारत बसले होते. तो मनाशी आढावा घेत होता. तिचं पेन्शन इतकं आणि आपलं पेन्शन तितकं. परंतु आज आपलं उत्पन्न तिच्यापेक्षा जास्त झालंय. वडिलांच्या फोटोपुढं उभा राहून तो हा साक्षात्कार त्यांना सांगत होता त्याचवेळी…
त्या दोघांचा इंजिनियर मुलगा आपल्याच ट्युशनच्या वर्गातील इंजिनियर मुलीशी प्रेमाचं बोलत होता. ती म्हणत होती, “बीई होताना मला तुझ्यापेक्षा पाच टक्के कमी मार्क पडले पण कॅंपस इंटरव्यूमध्ये मला तुझ्यापेक्षा मोठं पॅकेज मिळालं… मला कसतरीच होतंय.’ फोनवर तिला थोपटत तो म्हणाला, “यात वाईट वाटून घ्यायचं काय कारण आहे. हा फरक लायकीमुळं थोडाचं पडलाय… मी पास आउट झालोय एका वेगळ्या कॉलेजातून, तर तू झाली आहेस चांगल्या कॉलेजमधून. आणि दुसरं म्हणजे थोडंच आपण लग्न करणार आहोत… आपण फक्त एकत्र राहणार आहोत.’
आपल्या आजोबांच्या फोटोपुढून वडील बाजूला झालेले त्याने पाहिलं आणि का कोण जाणे त्याला आजोबांच्या फोटोला नमस्कार करावासा वाटला.