शिवाचं एका कंपनीतल्या टेंडरचं काम झालं होतं. कंपनीतून निघायची वेळ झाली होती. शिवानं लॅपटॉप स्वीचऑफ केला आणि पार्किंगमधून गाडी काढून मेनगेटजवळ आला. गेटच्या बाहेर येऊन मेन रोडवर जाण्यासाठी उजवीकडे टर्न घेणार एवढ्यात कोपऱ्यावरच्या मोठ्या दगडावर हातात मोठी पिशवी, अंगावरचे कपडे धुळीनं माखलेले आणि चेहरा काळवंडलेले एक वृद्ध गृहस्थ दिसले. ह्यांना कुठेतरी पाहिलयं असं त्याला वाटलं आणि अचानक त्याला आठवलं, अरे! हे तर आपल्या गावचे, सुरेशचे बाबा.
शिवानं गाडीचा क्लच दाबला आणि झर्रकन गाडी रिव्हर्स घेऊन तो त्यांच्या जवळ गेला. “काका ओळखलं का मला? मी खंडू जाधवचा मुलगा आणि तुम्ही इथे खाली काय बसलाय. आत जायचं ना.’ किसनरावांनी मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. “कोण… शिवा? खंडूचा पोरगा नव्हं. देवासारखा आलास की रं बाबा! अरं दोन तास झालं हितं बसलोय. मी त्या रखवालदाराला इच्यारलं तर तो म्हनाला महेशसायेब आता कंपनीत न्हाईत. आठ दीस झाले नोकरी सोडून गेलेत. पन मला तर फोनवर सांगितलं होतं आज मुंबईला जानार हाय म्हनुन. माजं तर हातपायच गळालं बग.’ तस गावाकडं त्यांची घरं शेजारी शेजारी, पण शिवाच्या आईवडिलांनी कामधंद्यासाठी गाव सोडलं आणि ते नगरला स्थायिक झाले होते.
“या… गाडीत या. मी सोडतो तुम्हाला.’ किसनराव आपली पिशवी घेऊन उठले आणि गाडीत येऊन बसले. “आधी एक ग्लास पाणी दे मला. काल आल्यापासून पोटाला भाकर बी खाल्ली नाय बघ.’ उपाशी असल्यामुळं त्यांचा चेहरा ओढलेला होता. शिवानं साइडबॅगमधून बिसलेरीची बॉटल काढून त्यांच्या हातात दिली. “काका, काही काळजी करू नका. मी आहे तुमच्याबरोबर. एक काम करू. इथं जवळचं चांगलं व्हेज रेस्टॉरंट आहे. तुम्ही आधी तिथं जेवून घ्या मग मी सोडतो तुम्ही म्हणालं तिथं.’ “शिवा कुट सोडणारं बाबा मला. गावाकडं जायलाबी पैसं न्हाय राहिलं. रात्री स्टॅंडवर झोपलो होतो तर कुणीतरी समदे पैसे चोरले. चांगले हजार रुपये होते बघं.’ किसनराव आपल्या धुळीनं माखलेल्या शर्टच्या बाहीन डोळे पुसत म्हणाले.
“पण मला हे समजलं नाही. महेश आठ दिवसांपूर्वीच नोकरी सोडून गेलाय. पण त्यानं तुम्हाला आज जाणार असं का सांगितलं?’ उपाशी असल्यामुळं घासावर घास पोटात ढकलणाऱ्या काकांना शिवानं विचारलं. “काय सांगू तुला… त्येचं लग्न झाल्यापासून आमचं नशीब बिघडलय बगं.’ किसनकाकांची गावाकडं दहा एकर शेती होती. विहिरीला पुरेसं पाणी नसल्यामुळे उत्पन्न यथातथाच होतं आणि त्यामुळं शेवंताबाईंना, महेशच्या आईला दुसऱ्याच्या शेतात मजुरी करायला लागायची. महेश त्याचा एकुलता एक मुलगा. किसनरावांना शिक्षणाची खूप आवड. गरिबीमुळे आपण शिक्षण घेऊ शकलो नाही याची त्यांना खंत होती. आपल्या महेशनं खूप शिकावं. मोठा साहेब व्हावं ही त्यांची मनापासून इच्छा आणि त्यामुळं त्यांनी महेशला चौथीपासून तालुक्याच्या गावात शिकायला ठेवलं होतं. त्याच्या हातात कधीही नांगर दिला नव्हता.
“हे बघ बये (किसनराव शेवंताबाईंला, बायकोला नेहमी बये म्हणून हाक मारायचे) हितं शेतात राबराबून आपल्या हाताला रट्टा पडल्यात. आपन एकवेळ पोटाला चिमटा घेऊन ऱ्हाहू पन पोराच्या हातात नांगर द्यायचा न्हाय. त्येला शिकवून मोठा करायचा. साहेब करायचा. अन् मग त्येला चांगली शिकलेली पोरगी बघून लग्न करून देऊ आणि त्येंचा राजारानीचा संसार सुरू झाला की त्येंच्या लेकरास्नी सांभाळत त्येच्याबराबर आनंदानं ऱ्हायचं… कंटाळा आलाय आता ह्ये असं आयुष्यभर उन्हातान्हात राबायचा.’ किसनरावांनी हे स्वप्न कितीतरी वेळा बायकोला बोलून दाखवलं होतं.
मुळात हुशार असलेला महेश ऑटो इंजिनिअर झाला आणि एका मोठ्या कंपनीनं त्याला कॉलेज कॅंपसमध्येच सिलेक्ट केलं. किसनरावांचा आनंद आता गगनात मावेनासा झाला होता. त्यांचं अर्ध स्वप्न आता पूर्ण झालं होतं.
एकेदिवशी महेश दोन दिवसांची रजा घेऊन गावी आला. “बाबा मला तुमच्याशी काही बोलायचंय. तुम्हाला आवडणार नाही पण…’ “बोल रं पोरा… तुज्यापेक्षा आम्हाला काय बी जास्त नाय. बोल.’ “बाबा आमच्याचं कंपनीतल्या वैशालीवर माझं प्रेम आहे. ती मुंबईची आहे. एमबीए झाली आहे आणि तिचंही माझ्यावर प्रेम आहे.’ “अरं मग अडचण काय हाय? एवढी शिकलेली आणि नोकरी करणारी सून मिळणार याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
आमी काय नाही म्हननार हाय का तुला?’ “तसं नाही बाबा… तिला वडील नाहीत त्यामुळं तिच्या आईनं तिला लहानाचं मोठं केलंय. तिच्या आईलाही आमचं लग्न मान्य आहे, पण माझा स्वतःचा फ्लॅट झाल्याशिवाय लग्न करायचं नाही अशी त्यांची अट आहे आणि आईच्या मनाविरुद्ध जायची वैशालीची इच्छा नाही. आई म्हणजे तिच्यासाठी देव आहे आणि माझी सर्व्हिस कमी असल्याने मला हौसिंग लोनपण कमी मिळतंय. त्यामुळे बाकीचे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न आहे.
“मग कय करावं म्हंतोस?’ किसनरावांच्या काही लक्षात आलं नाही.
“बाबा मी काय म्हणतो. आपणं दहा एकरातली पाच एकर जमीन विकून टाकू या. नाहीतरी शेताचं उत्पन काही पुरत नाहीच आणि काळजी करू नका. एकदा फ्लॅट झाला की मी तुम्हाला सहा आठ महिन्यांत घेऊन जाणार आहे. तुम्ही माझ्याकडे येऊन राहायचंय.’
आपल्या पोराच्या प्रेमापोटी… त्याच्या मनासारखी मुलगी मिळाली म्हणून किसनरावांनी बायकोचा विरोध असतानाही अर्ध शेतं तडकाफडकी विकून टाकलं होतं.
“अवं.. नीट इच्यार करा बरं का. आपलं शेत कसं का असेना. आपल्यासाठी म्हातारपणाची काठी हाय ती. आन त्या पोरीच्या आईला म्हनावं येवढं लेकीसाठी स्वत:चं घर पायजे तर दे की म्हनावं थोडं पैसं! एकुलती येक हाय न्हवं.’ पण किसनरावांनी बायकोच्या म्हणण्याकडं दुर्लक्ष केलं होतं.
महेशचं लग्न झालं. स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवलं होतं. हाय प्रोफाइल राहणी असलेल्या वैशालीनं आणि तिच्या आईनं खेडवळ किसनराव आणि शेवंताबाईकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं होतं. किंबहुना ते रिसेप्शनला आल्याचं त्यांना आवडलं नव्हतं. महेश तू अशा फंक्शनला तुझ्या मम्मी डॅडींना शक्यतो आणत जाऊ नकोस. मम्मीला आवडत नाही, वैशालीनं त्याच्या कानात सांगितलं होतं आणि हे सगळं बघून आणि ऐकून एका कोपऱ्यात अंग चोरून बसलेले किसनराव अस्वस्थ झाले होते.
लग्न होऊन सहा महिने होऊन गेले होते, पण आज ना उद्या महेश आपल्याला न्यायला येईल म्हणून डोळे लावून बसलेल्या किसनरावांना महेशचे फोन येणंही कमी झालं होतं. लग्नापूर्वी आठवड्यातून एकदातरी फोन करणाऱ्या महेशचा मागच्या तीन महिन्यांत एकही फोन आला नव्हता. किसनरावांचे फोनही तो उचलतं नव्हता. किसनराव बेचैन झाले. महेशच्या वागण्यात झालेला बदल त्यांना जाणवायला लागला होता. अखेर किसनरावांनी शेजारच्या बाळूकडून मेसेज केला. पोरा तुला बगावसं वाटतयं. लई दिवस झालं. शनिवारी मी तिकडं येतोय.
तीन महिने फोन न करणाऱ्या महेशचा आता मात्र लगेच फोन आला. “बाबा, तुम्ही इकडे येऊ नका. मी आणि वैशाली शनिवारी मुंबईला चाललोय. आम्ही दोघही मुंबईला शिफ्ट होतोय. वैशालीची ममा तिकडे एकटी आहे ना. त्या पण मुंबईत आमच्याकडेच राहायला येणार आहेत. तुम्ही काहीं काळजी करू नका. मी दर महिन्याला तुम्हाला पैसे पाठवत जाईन.’ एवढं बोलून महेशनं पुढं काहींही न बोलता फोन कट केला होता…
पण आपल्या पोरावरचं अपार प्रेम त्यांना स्वस्थ बसू देईना.. आणि महेशनं नको म्हटलं असतानाही ते त्याला भेटायला आले होते. किसनराव आता समजून चुकले. त्यांच्या येण्याच्या आधीच महेश जाणूनबुजून मुंबईला निघून गेला होता.
किसनरावांच जेवणं झालं होतं. त्यांनी अश्रूंनी डबडबलेले आपले डोळे पुसले. “शिवा.. चल पोरा.. तुच आता माझा पोरगा हायस. सोड मला स्टॅण्डवर.’ शिवानं त्यांना स्टॅण्डवर सोडलं आणि तिकीट काढून बसमध्ये बसवलं. किसनरावांनी पुन्हा एकदा आपले डोळे पुसले. त्यांनी पिशवीतनं स्टीलचा गोल डबा बाहेर काढला. “शिवा पोरा ह्ये ऱ्हाहू दे तुझ्याकडं. काकूनं दिलाय.’ शिवाने डबा उघडला. ते साजूक तुपातले डिंकाचे लाडू होते. काका, एवढा लाडूनं भरलेला डबा जवळ होता आणि तुम्ही दोन दिवस उपाशी फिरत होतात. शिवाला गहिवरून आलं होतं.
“शिवा.. आर त्ये लाडू ह्याच्या आईनं त्येला लई आवडतं म्हनून मुद्दाम बनवून पाठवले होते. अन् त्याच्यासाठी आनलेल्या लाडवाचा एक घास तर माझ्या घशात उतरल का सांग बरं. घे ते. नग म्हनून नगस. आता तूच आमचा महेश हायस बग.’
शिवानं त्यांचा हात हातात घेतला आणि आपुलकीनं थोपटला. शिवाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता त्या उघड्या डब्यातल्या लाडवावर पडत होते…
– कृष्णकेशव