डासांना आपल्या घामाचा वास, श्वासामधील कार्बनचा वास आवडतो. हा वास त्यांना चक्क पंचाहत्तर फुटावरून देखील येतो! अंगातील उष्णता, घाम, आर्द्रता, दृश्य संकेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्वचेतून येणारा वास. हे डासांना आकर्षित करतात. मला वाटते, आपल्या रक्ताचे गट देखील त्यांना कळत असावेत! कारण “ओ’ रक्तगटाच्या लोकांना डास जास्त चावतात! डासांपुढे रक्तपेढीतील उत्साही कार्यकर्ते देखील फिके पडतील! गडद आणि भडक रंगाचे कपडे घातले, अंगावर अत्तरे स्प्रे मारले, बीअरसारखे श्वासातून उत्सर्जन होणारे पेय पिले, अशा व्यक्तींना चावणे डासांना फारच आवडते. व्यायाम केला की शरीरातून कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन जास्त होते. गरोदर स्त्रियांच्या श्वासातून 20 टक्के जास्त कर्ब बाहेर पडतो. डासांना त्याचाच वास आकर्षित करतो आणि ते लगेच तिथे पोहोचतात.
आपल्या भोवताली असलेल्या हवेत असणारे सूक्ष्मकण डास लगेच पकडतात आणि तिथे आकर्षित होतात. आपल्याला डासीण चावते खरी, पण त्याअगोदर, तिच्या एवढ्याशा मेंदूत असलेले “सॉफ्टवेअर’ कार्यरत होते, तेच बरे वाईट रक्त कुठे मिळेल ते ठरविते!
डास हा मनुष्याला हानिकारक आहे, यात शंका नाही, त्यांच्यापासून सावध राहिलेच पाहिजे. डास व्यक्तीला चावले की त्याचे रक्त शोषून घेतात. त्या रक्तात हिवतापासारखे जंतू येतात, ते रक्तातून डासांच्या लाळेत येतात, ही लाळ दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येते. त्याच लाळेतून हिवतापासारखे जंतू मानवी शरीरात येतात आणि मग त्याला हिवतापाचा संसर्ग होतो. याचा अर्थ डासिणीचे चावणे तितके महत्वाचे नाही, जितका तिचा “ओला ओला’ पापा धोक्याचा!
आता हे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात, त्याला लगेच ताप येऊन हुडहुडी भरते. हे मानवाला समजायला एकोणिसावे शतक उजाडायला लागले. डासाविरुद्ध माणसाने युद्ध पुकारले ते त्यानंतर. संशोधन करून औषध हुडकले, “क्लोरोक्वीन’! जगभर गाजले. “हिवताप नियंत्रण कार्यक्रम’ गाजला, यशस्वी झाला. “हिवताप निर्मूलन कार्यक्रम’ असे नाव बदलले गेले. पण काही दशकांत हिवतापाचे जंतू मात्र अधिक उत्क्रांत झाले. आणि क्लोरोक्वीन प्रभावहीन झाले.
मग डास आणि हिवताप पुन्हा वाढले. नंतर “डीडीटी’ नावाच्या भयानक शस्त्राचा उदय झाला. सर्वत्र फवारणी चालू झाली, डास पटापट मारू लागले. जोडीला हिवतापाचे जंतू देखील. परंतु, काही वर्षातच या “डीडीटी’चे प्रताप दिसू लागले. कित्येक पक्ष्यांवर संक्रांत आली. गिधाडे चक्क नव्व्याणव टक्क्यांनी कमी झाली. मग या “डीडीटी’वर बंदी आणली गेली. आणि डास- जन्य आजारांनी पुन्हा डोके वर काढले. हे युद्ध असेच चालू राहणार आहे. असा डास आणि मानवी संघर्ष असाच सुरु राहणार.
एक मात्र खरे, हे डास मानवामध्ये अनेक आजार देतात. त्यांचे अतिशय गुंतागुंतीचे परस्पर नाते आहे. यातली नेमकी कडी उलगडून दाखवली ती सर रोनाल्ड रॉस यांनी. हा शोध 20 ऑगस्ट 1897 चा. दरवर्षी 20 ऑगस्ट हा “जागतिक मच्छर दिन’ म्हणून साजरा केला जातो. मलेरिया उर्फ हिवताप (परजीवी), पीतज्वर (विषाणू), डेंगू. डेंगी (विषाणू), मायक्रोसिफाली (झिका विषाणू), हत्तीरोग (परजीवी), वेस्ट नाईल आजार, चिकुन गुनिया ही यादी न संपणारी आहे.
याचे गांभीर्य ओळखले ते “जागतिक आरोग्य संघटना’ या संस्थेने. तिने 2017 मध्ये “ग्लोबल व्हेक्टर कंट्रोल रिस्पॉन्स’ (तउठ) ब तयार केला.एक कविता एकदा वाचली होती. कुणी लिहिली ते माहिती नाही, पण अगदी सार्थ आहे.
डासांचा सुकाळू, मलेरियाचा आधारू
बहुत करावा भ्रष्टाचारू, पालिकेने ें ें
असे कामगार येती, औषध मारुनिया जाती
तरी डास आम्हां चावती, दिवसाराती ें ें
असा हा पालिकेचा फवारा, डासांनी पचविला सारा
आम्ही म्हणतो मारा मारा, डासांना या ें ें
डास मानवाला आजारी पाडतात, हे सत्य. पण आपण वास्तव समजून घेऊ या. डासांच्या हजारो जातींपैकी मोजक्याच जाती मनुष्याला धोकादायक आहेत. त्यांच्यापैकी केवळ तीन जातीच्या माद्या परजीवी संक्रमित करतात. म्हणून आपण डासांचे पर्यावरणीय महत्व लक्षात घेऊ. त्यांची प्रजनन क्षमता इतकी अफाट असते, की डास हेच इतरांचे भक्ष्य आहे. मासे, बेडूक, कीटक, पक्षी यांचे डास हे प्रमुख अन्न आहे. मूठभर जातींचे डास मानवाला हानिकारक. पण डास ही प्रजाती मात्र पर्यावरणाला आवश्यक.
आपण काय करायचे? नुसतेच डास मारत बसायचे? की कीटक नाशक फवारत बसायचे? आजूबाजूला स्वच्छता (नेमके काय?) ठेवायची? की खिडक्या-दाराना पडदे लावायचे? पावसाळ्यात रानात गाई- म्हशीला डास खूप त्रास देतात. त्यावर उपाय म्हणून शेतकरी त्यांना चरायला सोडण्यापूर्वी
त्यांच्या सर्वांगाला नारळाच्या किशीने “कडुतेल’ फासतात. कडुतेल हे समुद्रकिनारी आढळणाऱ्या ‘उंडिल’ या वनस्पतीच्या फळापासून काढलेलं तेल. करडई, करंज या वनस्पतींपासून देखील असेच कडुतेल काढतात. कडुतेल फासलं की म्हशीच्या अंगावर डास- माशा बसत नाहीत. घराशेजारी ओलसर, कुंद, अंधारी जागा नसावी. ठिकठिकाणी टबमध्ये कमळे लावून त्यात गप्पी मासे सोडावेत.कासव छाप किंवा रासायनिक फवारणी करू नये. ती आपल्याला देखील घातक असते.
आपण पंखा लावला तरी डास लांब जातात. नुसत्या टाळया वाजवल्या तरी डास पळून जातात. आपल्या घराभोवती कचरा भरपूर साठला की डासांची संख्या वाढलीच म्हणून समजा. मग आपल्याला सारख्याच टाळ्या वाजवत बसावे लागेल. हा दिवस देखील फारसा दूर नाही! आपण बसल्याजागी टाळ्या वाजवत सुटलो तर…
तर ..
लोक सार्थ म्हणतील,
एक साला मच्छर, आदमी को हिजडा बना देता है..
मग ठरवा कुणी कुणाला म्हणायचे ,
गुड नाईट, मित्रा..