नागपूर – भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीकडुन ओबीसीचा केवळ वापर होतो, असे जे मत व्यक्त केले ते फार चुकीचे आहे. त्यांनी संपूर्ण माहिती घ्यावी आणि नंतरच वक्तव्य करावे. सत्तेत येताच तीन महिन्यांत ओबीसींना राजकीय आरक्षण देऊ असे आश्वासन देणारी भाजप आता एक वर्षापासुन सत्तेत आहे. आता त्या आश्वासनाचे काय झाले. उलट ओबीसींचे राजकीय आरक्षण संपविण्याचा विडाच भाजपाने उचलला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते, आमदार अनिल देशमुख यांनी केला.
अनिल देशमुख म्हणाले, राष्ट्रवादीत ओबीसीसह इतर समाजाला नेहमीच बरोबर घेतले आहे. ओबीसी समाजातील नेत्यांना पक्षात महत्त्वाची पदे आणि सरकारमध्ये महत्त्वाची खाती सुध्दा दिली आहेत. उलट भाजपाकडुनच ओबीसी समजावर नेहमी अन्याय होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत असून त्याची अनेक उदारणे सुध्दा आहेत, असा घणाघात त्यांनी केला.
गेल्या अनेक महिन्यांपासून ओबीसींची जातीनीहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात येत आहे. जर ही जनगणना झाल्यास ओबीसीमध्ये येणारे कुणबी, तेली, माळी यांच्यासह इतर जवळपास साडेतीनशे जातीची संपूर्ण आकडेवारी समोर येईल. त्यानुसार त्यांना शासकीय योजनाचे लाभ होईल. परंतु ओबीसी समाजातील नागरीकांना शासकीय योजनांचा लाभ मिळु नये यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहे.
ओबीसी महामंडळाला सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने केवळ 55 कोटी रुपये दिले. राज्यात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा वित्त खाते अजित पवार यांच्याकडे होते आणि त्यांनी जवळपास 250 कोटी रुपये दिले होते. 2014 च्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले, असा प्रश्नसुध्दा त्यांनी केला.